ऐतिहासिक इमारत पाडण्याचा निर्णय तूर्तास स्थगित पाडकामाला ब्रेक; वारसा वास्तूच्या संरक्षणासाठी नेत्यांचा विरोध
Heritage Conservation: अमरावती शहराच्या ऐतिहासिक ओळखीचा भाग असलेल्या स्थानिक रेल्वे स्थानकाची जुनी इमारत पाडण्याच्या हालचालींना अखेर जनतेच्या तीव्र विरोधामुळे तूर्तास ब्रेक लागला आहे. स्थानकाची ऐतिहासिक वास्तू पाडण्याच्या निर्णयावरून नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने पाडकामाची प्रक्रिया पुढे ढकलल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. त्यामुळे ऐतिहासिक वास्तूच्या संरक्षणासाठी सुरू झालेल्या लढ्याला तूर्तास यश आले आहे. रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार, जुन्या स्थानकाची इमारत पाडण्याचे आदेश मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून देण्यात आले होते. त्यानंतर स्थानक परिसरात बॅरिके उभारण्यात आले होते. संबंधित इमारत पाडून त्या जागेवर रेल्वे कार्यालयांसाठी नवीन इमारत उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी खासगी कंत्राटदारामार्फत पाडकामाची तयारी सुरू होती.(फोटो सौजन्य – AI)
मात्र, ही वास्तू महाराष्ट्र शासनाच्या ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत समाविष्ट असल्याने पाडकामाच्या निर्णयावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अमरावती आणि बडनेरा परिसरातील संरक्षित ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत या इमारतीचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शासनाच्या वारसा यादीत असलेली वास्तू पाडण्यासाठी परवानगी नेमकी कोणी दिली, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, स्थानकाच्या स्थापनेच्या वर्षाबाबतही संभ्रम आहे. गुगलवरील नोंदीनुसार स्थानकाची स्थापना १८५९ मध्ये झाली असून, त्यानुसार ही वास्तू सुमारे १६७ वर्षे जुनी ठरते. मात्र, स्थानक परिसरातील उद्घाटन फलकावर १९५३ हे वर्ष नमूद आहे.सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत या ऐतिहासिक वास्तूचे अस्तित्व टिकवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली.ऐतिहासिक वास्तू शहराच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा मुख्य भाग आहे, असे सुद्धा सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत समावेश असलेल्या इमारतीच्या पाडकामाचा निर्णय रेल्वे प्रशासनाने कोणत्या आधारावर घेतला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि संबंधित वारसा प्राधिकरणाकडून अधिकृत खुलासा होणे आवश्यक आहे. राज्याच्या वारसा यादीमध्ये सामाविष्ट्या असलेली ऐतिहासिक कोणत्याही परिस्थिती पडली जाऊ नये, अशी माहिती डॉ. सुनील देशमुख, माजी राज्यमंत्री यांनी दिली आहे. मौल्यवान सरकारी जमिनीवर कब्जा करण्याचा हा प्रयत्न आहे. शहराची ऐतिहासिक ओळख जपणारी ही वास्तू वाचविण्याची आमची मागणी केली आहे, बळवंत वानखडे, खासदार, अमरावती यांनी दिली आहे.






