'टीबीमुक्त भारत'चा नारा कागदावरच! बीपीएचयू केंद्रांमध्ये किट्सचा तुटवडा; टू-नॅट मशीन असूनही तपासणीला ब्रेक
एकीकडे केंद्र आणि राज्य सरकारकडून ‘टीबीमुक्त भारत’चा गाजावाजा केला जात असताना, दुसरीकडे जिल्ह्यातील बीपीएचयू केंद्रांमध्ये क्षयरोगाच्या (टीबी) तपासणीसाठी आवश्यक किट्सचा तुटवडा निर्माण झाला. गत महिनाभरापासून टू-नॅट मशीनच्या किट्स उपलब्ध नसल्याने तपासणीचा वेग मंदावला असून, अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असतानाही रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे.(फोटो सौजन्य – istock)
बीपीएचयू केंद्रांमध्ये टू-नेंट मशीन उपलब्ध करून देण्यामागे क्षयरोगाचे लवकर आणि अचूक निदान करून तत्काळ उपचार करण्याचा उद्देश आहे. मात्र, या मशीनसाठी आवश्यक किट्सचा पुरवठाच ठप्प झाल्याने अत्याधुनिक यंत्रणेचा अपेक्षित वापर होत नसल्याचे चित्र आहे. गेल्या महिनाभरापासून किट्स उपलब्ध नसल्याने तपासणीचे काम संथ गतीने सुरू असल्याची माहिती आहे. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचे वेळीच निदान होणे उपचाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. तपासणीला विलंब झाल्यास रुग्णाच्या उपचारावर परिणाम होण्याबरोबरच संसर्गाचा प्रसार रोखण्याच्या प्रयत्नांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी शासनाकडून विविध अभियान राबविण्यात येत आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच तपासणीची सुविधा मिळावी, यासाठी बीपीएचयू केंद्रांची उभारणी करण्यात आली.
मात्र, ज्या केंद्रांवर क्षयरोगाची तपासणी होणे अपेक्षित आहे, तेथे आवश्यक किट्सच उपलब्ध नसतील तर ‘टीबीमुक्त भारत’चे उद्दिष्ट कसे साध्य होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच दर्जेदार आरोग्यसेवा आणि आवश्यक तपासण्या उपलब्ध करून देण्यासाठी बीपीएचयू केंद्रांची निर्मिती करण्यात आली. मात्र, किट्सचा अभाव, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर नियंत्रणाचा अभाव कायम राहिल्यास या केंद्रांच्या उभारणीमागील मूळ उद्देशच धोक्यात येण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ कागदी अहवालांवर विसंबून न राहता बीपीएचयू केंद्रांची अचानक पाहणी करावी. टू-नेंट किट्सचा तातडीने पुरवठा करावा आणि लॅब टेक्निशियनच्या उपस्थितीची काटेकोरपणे तपासणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बीपीएचयू केंद्रांमध्ये टू-नेंट मशीनच्या किट्स सध्या उपलब्ध नाहीत. मात्र, काही दिवसात किट्स उपलब्ध होतील. यासाठी कार्यालयाकडून दर महिन्याला किट्सची मागणी केली जात असल्याची माहिती अमरावतीच्या प्रभारी क्षयरोग अधिकारी डॉ. ज्योती खडसे यांनी दिली.जिल्ह्यातील काही बीपीएचयू केंद्रांमधील लॅब टेक्निशियनच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण नसल्याने आहे. काही ठिकाणी दररोज नियमित ड्युटी करण्याऐवजी आड दिवस ड्युटी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.






