
ST bus travel at discounted rates to visit tourist places in Hingoli district
ST Bus News : हिंगोली : हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भाविकांसाठी दिलासादायक उपक्रम राबविण्यात येत असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मार्फत “एसटी संगे तीर्थाटन” ही विशेष धार्मिक पर्यटन योजना सवलतीच्या दरात सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश सर्वसामान्य प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर व किफायतशीर दरात देवदर्शन घडवून आणणे हा आहे.
या योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत व कळमनुरी या तीनही आगारांतून विशेष नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक आगारातून किमान पाच बसेस राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ४० प्रवाशांचा गट पूर्ण झाल्यास मागणीनुसार तात्काळ नवी कोरी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या या योजनेची व्यापक जनजागृती सुरू आहे. “स्वस्त, सुरक्षित व विश्वासार्ह प्रवास” या ब्रीदवाक्यावर आधारित ही योजना खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत कमी दरात व अधिक सुरक्षित प्रवासाची हमी देणारी ठरणार आहे.
हे देखील वाचा : हिंगोली जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख उंचावतोय; ठोस पाऊले उचलण्याची नागरिकांची मागणी
या विशेष तीर्थाटन व पर्यटन सहलींमध्ये अष्टविनायक, ज्योतिर्लिंग दर्शन, सोमवार महादेव दर्शन, नवरात्रोत्सव काळात साडेतीन शक्तीपीठ दर्शन, अक्कलकोट, पंढरपूर तसेच किल्ले, सागरी पर्यटन स्थळे, ताडोबा, चिखलदरा आदी पर्यटनस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. शालेय सुट्ट्या, सलग सुट्ट्यांचा कालावधी व उत्सव काळ लक्षात घेऊन सहलींचे नियोजन केले जाणार आहे. सहलीचे नियोजन करताना सामाजिक संस्था व देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्याने निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असून, मात्र निवास, चहापान व नाश्त्याचा खर्च प्रवाशांना स्वतः करावा लागणार आहे. प्रवासाचा कालावधी एक किंवा अधिक दिवसांचा असू शकतो व अंतरानुसार तिकीट दर निश्चित करण्यात येणार आहेत.
हे देखील वाचा : राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा उभारी! तीन दिवसांच्या शोककाळानंतर मावळ तालुक्यात उमेदवारांच्या भेटीगाठी
सर्व शासकीय सवलती लागू
या योजनेत राज्य शासनाच्या सर्व सामाजिक सवलती लागू राहणार आहेत. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अमृत महोत्सव’ योजनेअंतर्गत मोफत प्रवास महिलांसाठी ‘महिला सन्मान’ योजनेत ५० टक्के सवलत इतर सामाजिक घटकांसाठी लागू असलेल्या सवलती जशाच्या तशा ही योजना २६ जानेवारीपासून राज्यातील २५१ आगारांत एकाच वेळी राबविण्यात येत असून, हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही आगारांचा त्यात समावेश आहे. या उपक्रमामुळे धार्मिक व पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार असून, सर्वसामान्य भाविकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक वारशाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.