महाराष्ट्राला पावसाचा इशारा (फोटो- सोशल मीडिया)
राज्यातील काही भागात अंशतः आभाळी हवामान
दक्षिण भागांमध्ये दुपारनंतर स्थानिक स्वरूपाचा वादळी पावसाची शक्यता
मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती इशारा
मुंबई: सध्या राज्यातील काही भागात अंशतः आभाळी हवामान असून ही स्थिती या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या दक्षिण भागांमध्ये दुपारनंतर स्थानिक स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. हा पाऊस प्रामुख्याने कर्नाटक व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये राहण्याची शक्यता आहे.
30 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. उर्वरित विदर्भात देखील हवामानात बदल दिसू शकतो. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही. 31 मार्च रोजीदेखील राज्याच्या काही भागांमध्ये या हवामानाचा परिणाम दिसू शकतो.
शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
Mahabaleshwar ची थंडी उडाली दूर! अवकाळी पावसामुळे पर्यटकांची तारांबळ; वादळी वारे अन्…
Mahabaleshwar ची थंडी उडाली दूर
मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात वाढलेल्या प्रचंड उकाड्यानंतर पर्यटननगरी महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने धडाकेबाज हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात सुमारे एक तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर थंडगार झाला, मात्र या अनपेक्षित पावसामुळे पर्यटकांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सायंकाळी सातच्या सुमारास अचानक काळे ढग दाटून आले आणि काही क्षणांतच जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. पर्यटन हंगामाच्या सुरुवातीलाच मोठ्या संख्येने महाबळेश्वर आणि पाचगणीत दाखल झालेल्या पर्यटकांना या अवकाळी पावसाचा अनपेक्षित सामना करावा लागला.
अनेक पर्यटकांनी या पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद घेतला, तर काहींना सुरक्षित ठिकाणी आसरा शोधण्यासाठी धावपळ करावी लागली. प्रमुख बाजारपेठा, पर्यटनस्थळे आणि रस्त्यांवर अचानक गर्दी उसळल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले.






