
फोटो सौजन्य - Social Media
वडूज : तडवळे (ता. खटाव) येथील राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेली माळवे यांची विहीर सध्या ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठीव शाळकरी विद्यार्थी आणि वाहनधारकांसाठी अत्यंत धोकादायक बनली आहे. या विहिरीची संरक्षण भिंत कोसळल्यामुळे रस्ता खचला असून, येथे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, वारंवार मागणी करूनही प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रस्ता खचल्याने अपघाताचे निमंत्रण
गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये या विहिरीची संरक्षण भिंत विहिरीत कोसळली होती. भिंत पडल्यामुळे रस्त्याचा मोठा भाग खचला आहे. याच अरुंद आणि खचलेल्या रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि अवजड वाहने जीव मुठीत धरून ये-जा करत आहेत. आगामी पावसाळ्यात रस्ता अधिक खचून थेट विहिरीत कोसळण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत पंढरपूर येथील दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती तडवळे ता.खटाव येथे होण्याची भीती नाकारता येत नाही. रात्रीच्या वेळी तर हा धोका अधिकच वाढतो.
तहसीलदारांच्या पाहणीनंतरही कारवाई शून्य
विशेष बाब म्हणजे, स्वतः तहसीलदारांनी या धोकादायक विहिरीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आहे. मात्र, या पाहणीला बराच काळ उलटूनही प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही किंवा सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. अधिकाऱ्यांच्या या संथ कारभारामुळे ग्रामस्थांमधून आश्चर्य आणि तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीच्या पत्राला बांधकाम विभागाची केराची टोपली
तडवळे ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) लेखी पत्र देऊन या समस्येची गांभीर्याने दखल घेण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु, बांधकाम विभागाने या संवेदनशील विषयाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे रात्रीच्या वेळी एखादे वाहन विहिरीत कोसळून मोठी जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल प्रशासक तथा सरपंच सौ रूपाली खाडे यांनी प्रशासनाला केला आहे.कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागाने आणि जिल्हा प्रशासनाने तात्काळ या विहिरीची दुरुस्ती करावी किंवा सुरक्षिततेसाठी मजबूत संरक्षण भिंत/बॅरिकेड्स उभारावेत, अशी आग्रही मागणी सरपंच सौ रुपाली खाडे व ग्रामस्थांकडून केली जात आहे.