पुणे : राज्यभरातील कारागृहात शिक्षा भोगणारे कुशल तसेच अकुशल कैद्यांच्या (बंदी) वेतनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, विविध उद्योगांत काम करणाऱ्या कैद्यांना वेतनवाढ देण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून याबाबत कारागृह प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत होते. यंदा शासनाने कैद्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील जवळपास साडे सहा हजार कैद्यांना या वेतवनवाढीचा फायदा होणार आहे.
राज्यात छोटी-मोठी एकूण (मध्यवर्ती व ओपन) ४८ कारागृह आहेत. यात शिक्षाधीन (शिक्षा सुनावलेले) व अंडरट्रायल (न्यायालयात सुनावणी सुरू असलेल्या केसेसमधील न्यायालयीन बंदी) बंदीवान आहेत. त्यांची संख्या ही ४३ हजारांच्या जवळपास आहे. क्षमतेपेक्षा अधिक संख्या कारागृहांमध्ये आहे. दरम्यान, शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांत सुधारणा व्हावी, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम कारागृह विभाग राबवत असतो. कारागृहात विविध उद्योग आहेत. शिक्षा भोगून बाहेर पडणाऱ्या कैद्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना विविध प्रकारचे रोजगारविषयक प्रशिक्षण दिले जाते. विविध उद्योगांत काम करणाऱ्या कैद्यांना वेतन दिले जाते.
दरम्यान, या कैद्यांना देण्यात येणाऱ्या वेतनात गेल्या काही वर्षांपासून वाढ झालेली नव्हती. त्यामुळे कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी वेतनवाढ करण्याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून, रविवारपासून (२० ऑगस्ट) वेतनवाढ लागू करण्यात येणार आहे.
काम करणाऱ्या कैद्यांना दैनंदिन वेतन दिले जाते. कैदी त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू कारागृहातील उपाहारगृहातून याद्वारे खरेदी करतात. दैनंदिन वेतनापोटी मिळणारी रक्कम टपाल खात्याच्या सुविधेतून कुटुंबीयांना देखील पाठविली जाते. काही कैदी दैनंदिन वेतनातून वकिलांचे शुल्क भरतात. कैदी कारागृहातील विविध उद्योगात काम करत असल्याने त्यांच्यात स्वावलंबनाची भावना निर्माण होते.
ही काम चालतात कारागृहात…
राज्यातील काही मोठ्या कारागृहात सुतारकाम, लोहारकाम, चर्मकला, हातमाग, यंत्रमाग, बेकरी, उपहारगृह, गॅरेज, मूर्तीकाम, होजिअरी उत्पादन, चादर, भांडी, दैनंदिन वापरातील वस्तू तयार करण्याचे उद्योग चालविले जातात. तेथे हे कुशल कैदी काम करतात. त्यातून त्यांना रोजगार मिळतो.
[blockquote content=”राज्यातील कारागृहातील विविध उद्योगात दररोज ७ हजार कैदी काम करतात. यात सहा हजार ३०० पुरुष असून, ३०० महिला कैद्यांचा समावेश आहे. राज्य शासनाने कारागृहातील विविध उद्योगांत काम करणाऱ्या दैनंदिन वेतनवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील साडे सहा हजार कैद्यांना फायदा होणार आहे.” pic=”” name=”- अमिताभ गुप्ता, अतिरिक्त पोलीस महासंचालक, कारागृह विभाग”]
कारागृहात शेती
कारागृहातील कैद्यांना लागणाऱ्या फळभाज्या कारागृहातील शेतात पिकवल्या जातात. कृषी विद्यापीठांच्या मार्गदर्शनाने कारागृहात शेती केली जाते. कारागृहासाठी शेती पूरक व्यवसाय असून, येथे शेळी पालन, कुक्कुट पालन, मस्यपालन, गोपालन, मधमाशी पालन, महाबीज उत्पादन, दूग्ध उत्पादन, चंदन लागवड, साग लागवड, गुऱ्हाळ, मशरुम उत्पादन, बायोगॅस प्रकल्प आदी व्यवसाय आहेत. कारागृहात नियमित काम करणाऱ्या कैद्यांना शिक्षेतून माफी मिळते. त्यामुळे कारागृहातून त्यांची लवकर मुक्तता होते. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना कारागृहात उत्पादित होणाऱ्या ६६ वस्तू कारागृहात खरेदी करणे बंधनकारक आहे. कैद्यांना काम उपलब्ध झाल्याने त्यांना नियमित आर्थिक मोबदला मिळतो. कारागृहातील रोजगार निर्मिती वाढवण्याची जबाबदारी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.