मंचर : आंबेगाव तालुक्यातील खडकी येथे मुक्तादेवी यात्रा उत्सवनिमित्त झालेल्या बैलगाडा शर्यतीत माजी आदर्श सरपंच गोविंद खिलारी यांचा बैलगाडा घाटाचा राजा किताबाचा मानकरी ठरला आहे, अशी माहिती यात्रा कमिटीचे संयोजक आणि भिमाशंकर कारखान्याचे संचालक दादाभाऊ पोखरकर यांनी दिली.
लंपी आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रशासनाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली असून प्रथमच खडकी येथे शर्यतीचा थरार रंगला. मुक्तादेवी यात्रा उत्सवानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत तब्बल ८१५ बैलगाडा मालकांनी नोंदणी केली. ही यात्रा चार दिवस चालणार आहे. शर्यतीच्या पहिल्या दिवशी जिजाबा दगडू वाघमारे, सगाजी पाटील व सरपंच नारायण बांगर यांच्या हस्ते शर्यतीच्या घाटाचे उद्घाटन झाले.
अजिंक्य खांडेभराड यांचा बैलगाडा प्रथम
प्रथम क्रमांकात खेड येथील अजिंक्य सुधीर खांडेभराड यांचा बैलगाडा फळीफोड ठरला, द्वितीय क्रमांकात सावरगाव येथील शिवाजीराजे बबनराव चिकणे, तर तृतीय क्रमांकात गुंडाळवाडी येथील संतोष अनंता भोर यांचे बैलगाडे फळीफोड ठरले. घाटाचा राजा हा किताब माजी आदर्श सरपंच गोविंद खिलारी यांच्या बैलगाड्याने पटकावला.
पिंपरी चिंचवडचे माजी महापौर राहुल जाधव, भाजपाचे संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक अंकित जाधव, माजी संचालक संजय बाणखेले, उद्योजक बाबाजी टेमगिरे यांनी यात्रेला भेट दिली. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याचे स्विय सहाय्यक भिवसेन भोर, भीमाशंकरचे संचालक दादाभाऊ पोखरकर, दत्ता हगवणे, बाळासाहेब पोखरकर, दत्ता भोर, यात्रा कमिटी अध्यक्ष विशाल वाबळे, अभिषेक वाबळे, माजी सरपंच अशोक भोर आदींनी यात्रेची व्यवस्था पाहिली. निशाणाची जबाबदारी बाबुराव शिंदे यांनी पार पाडली. ही यात्रा रविवारपर्यंत सुरू राहणार आहे. शासनाने घालून दिलेल्या नियम व अटीचे पालन करत शर्यत पार पडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.