
Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद निवडणूक घराणेशाहीच्या विळख्यात; सत्तेसाठी थेट रणसंग्राम
Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद निवडणूक विकास, मूलभूत प्रश्न आणि योजनांच्या चौकटीबाहेर जाऊन सत्तेसाठीच्या थेट रणसंग्रामात रूपांतरित झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने एकमेकांविरोधात पूर्ण ताकद पणाला लावली असून, या संघर्षात घरातील लेक, सून, भावजय, पत्नी यांनाच राजकीय आखाड्यात उतरवण्यात आले आहे. परिणामी ही निवडणूक केवळ मतदानापुरती मर्यादित न राहता राजकीय अस्तित्व आणि वारशाची लढाई ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद जिंकण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी घराणेशाहीचे शेवटचे अख बाहेर काढले आहे. यात जनमताची कसोटी लागणार आहे.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे चिरंजीव सूरज पाटील राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून अहमदपूर पंचायत समितीतील शिरूर ताजबंद गणातून निवडणूक लढवत आहेत. या गटात तिरंगी लढत रंगली असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. भाजप प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांच्या भावजय रेखाताई तरडे-हाके खंडाळी गटातून मैदानात उतरल्याने भाजपनेही कुटुंबीय राजकारण स्वीकारल्याचे दिसून येते. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांचे पुतणे अजिंक्य देशमुख हाडोळती गटातून रिंगणात असून, घरातील
सत्ता घरातच राखण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य मुद्रिका भिकाणे यांचे चिरंजीव सचिन भिकाणे अंधोरी गटातून शिवसेना (शिंदे गट) कडून लढत आहेत. बेलकुंड साखर कारखान्याचे चेअरमन श्याम भोसले यांच्या पत्नी दीपाली भोसले काँग्रेसकडून मातोळा गटात उतरल्या आहेत. उबाठाचे
जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या पत्नी अरुणा सोमवंशी लोदगा गटातून, तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामदास चव्हाण यांच्या पत्नी शालिनी चव्हाण लामजना गटातून काँग्रेसकडून लढत आहेत.
महिला उमेदवारांच्या नावाखाली प्रत्यक्षात पुरुष नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपाचे माजी खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या कन्या सुप्रिया श्रृंगारे रोहिणा गटातून भाजपकडून मैदानात उतरल्या असून, त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कडून उदगीरच्या माजी नगराध्यक्षा उषा कांबळे उभ्या आहेत. त्यामुळे या गटात भाजपाविरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, माजी आ. दिनकर माने यांनी मशाल सोडून कमळ हाती घेतल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.