यंदा राज्यात पाऊस व अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान
आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा
बाधितांना ७३ कोटी ९१ लाख ४३ हजारांची मदत
मुंबई: राज्यात जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधितांना ७३ कोटी ९१ लाख ४३ हजाराच्या मदतीस राज्य शासनाने मान्यता दिली असून याबाबतचे शासन निर्णय जारी करण्यात आले असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले, नैसर्गिक आपत्तीत बाधित शेतकऱ्यांना मदत आणि दिलासा देण्यास शासनाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. शासनाने बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करुन मदत देण्याच्या घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टी व अवकाळी पाऊस या आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना उभारी मिळेल, असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.
ही मदत देण्यास मान्यता देण्यात आलेल्या कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जून २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे शेत पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना ३७ लाख ४० हजार रुपये तर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यात जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत शेत पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ५४ लाख ३ हजार मदतीचा समावेश असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले.
अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे शेत पिकांच्या नुकसानीपोटी रायगड जिल्ह्यातील ९८० बाधित शेतकऱ्यांच्या ५५.६५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ११ लाख ८१ हजार रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील ५६० शेतकऱ्यांच्या ७१.५४ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १२ लाख ९६ हजार रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३३५ शेतकऱ्यांच्या ५०.६४ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १२ लाख ६३ हजार रुपये असे १ हजार ८७५ शेतकऱ्यांच्या १७७.८३ हेक्टरवरील बाधित झालेल्या पिकांसाठी मदत म्हणून ३७ लाख ४० हजार रुपये इतक्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.
Maharashtra Rain News: अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
विभागीय आयुक्त नागपूर यांनी पाठवल्या २१ जुलै २०२५ च्या प्रस्तावानुसार नागपूर जिल्ह्यात जून २०२५ मध्ये १ बाधित शेतकऱ्याच्या ०.४० हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ९ हजार रुपये तर जुलै २०२५ मधील नुकसानीच्या मदतीसाठी १८ ऑगस्ट २०२५ रोजी पाठविलेल्या प्रस्तावानुसार नागपूर जिल्ह्यातील ७ हजार ४५० शेतकऱ्यांच्या ४५५९.६२ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ३९२.८३ लाख रुपये. वर्धा जिल्ह्यात जून २०२५ मध्ये ८२१ शेतकऱ्यांच्या ४८५.८० हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ४१.५४ लाख, तर जुलै २०२५ मधील नुकसानीच्या मदतीसाठी २ हजार ८२७ शेतकऱ्यांच्या २२२४.९१ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १८९.२२ लाख, चंद्रपूर जिल्ह्यात जून व जुलै २०२५ मधील नुकसानीच्या मदतीसाठी १३ हजार ७४२ शेतकऱ्यांच्या ८६२१.०६ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ७३३.०० लाखाच्या मदतीचा समावेश आहे.
विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून हिंगोली जिल्ह्यात जुलै २०२५ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मदतीसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार ३९६ शेतकऱ्यांच्या २१५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १८.२८ लाखाच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यात जुलै २०२५ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मदतीसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार ५९ हजार ११० शेतकऱ्यांच्या ५६ हजार ९६१.७३ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ५९७९.१७ लाखाच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे.