
maharashtra tourism
मुलांना शाळेची सुट्टी लागली की प्रत्येकजण कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतो. अनेक जण सुट्टीमध्ये कोकण फिरण्यासाठी येतात आणि काही दिवस निसर्गाच्या सान्निध्यात आनंदाने घालवतात. दैनंदिन धावपळीच्या जीवनातून थोडासा विरंगुळा मिळावा आणि शांत, सुंदर आयुष्याचा अनुभव घ्यावा यासाठी आधीच पर्यटनाचे नियोजन केले जाते. त्यापैकी एक खास ठिकाण म्हणजे आपले कोकण.
कोकणात असे काय नाही जे पर्यटकांना आवडणार नाही? निसर्गसौंदर्याने नटलेले समुद्रकिनारे, ऐतिहासिक मंदिरे, किल्ले, स्वादिष्ट खाद्यसंस्कृती, हापूस आंबे, काजू, फणस अशा अनेक गोष्टी कोकणाची ओळख आहेत. त्यामुळे सुट्टी असो किंवा वीकेंड, पर्यटकांची पावले आपोआप कोकणाकडे वळतात.उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी प्रसिद्ध ठिकाणांमध्ये मालवण-तारकर्लीचा विशेष उल्लेख केला जातो. समुद्र आणि निसर्गाचा सुंदर वारसा लाभलेल्या या भागात स्कुबा डायव्हिंग, होमस्टे, रिसॉर्ट्स आणि विविध पर्यटनस्थळांना मोठी मागणी असते. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे येथील सर्व व्यवस्था अनेकदा हाउसफुल दिसून येतात. यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. म्हणूनच मालवण-सिंधुदुर्ग हे नेहमीच हॉट डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते.
त्सुनामी बेट, देवबाग, तारकर्ली बीच, चिवला बीच, आचरा समुद्रकिनारा तसेच सिंधुदुर्ग किल्ला आणि राजकोट किल्ला ही पर्यटकांच्या आकर्षणाची प्रमुख केंद्रे आहेत. मात्र, वाढती वाहतूक आणि पर्यटकांची गर्दी यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होताना दिसते. काही ठिकाणी खराब रस्ते आणि पर्यटकांकडून होणारी अस्वच्छता यामुळे या सुंदर पर्यटनस्थळांना गालबोट लागते. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून पर्यटकांना स्वच्छता राखण्याचे तसेच नियम पाळण्याचे आवाहन केले जाते.समुद्रात उतरताना सुरक्षेचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वतःच्या जीवाची काळजी घेत सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद घ्यावा, जेणेकरून आपली ट्रिप कायम स्मरणात राहील. मालवणमधील सुंदर मंदिरे आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले किल्ले पर्यटकांचे मन मोहून टाकतात. त्यामुळेच मालवण हे सुट्टीसाठी एक महत्त्वाचे आणि लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून पाहिले जाते.