File Photo : manoj jarange
मुंबई : मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक परिसरात शनिवारी मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचा समारोप झाला. मनोज जरांगे यांनी यावेळी मोठ्या संखेने जमलेल्या मराठा बांधवांसोबत संवाद साधला. तसेच 20 जुलैपासून आमरण उपोषण करण्याची घोषणा केली.
मनोज जरांगे यांनी म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण द्यावे. ही गर्दी फक्त संभाजीनगरची आहे. राज्यातील मराठ्यांची लाट निघाली ना तर चालायला मोठी जागा लागेल. सरकारला एकच संधी आहे. 20 तारखेला तारीखच जाहीर करणार आहे.
288 उमेदवार उभे करायचे की पाडायचे या तारखेला ठरवण्यात येईल. 20 तारखेला आमरण उपोषण सुरू करणार आहे. पण उमेदवार पाडायची आणि मुंबईला कोणत्या तारखेला जायचे या दोन तारखा ठरवायच्या आहेत. एकदा जे ठरले त्यात बदल नाही.
प्रत्येकवेळी सरकार अपयशी ठरले
मी फडणवीस, शिंदे, अजित पवार आणि महाजन यांनाही डावात हरवले. ही सोपी गोष्ट नाही. भुजबळ आता काहीही बडबडताय. प्रत्येक वेळी सरकार फसले. त्यांनी आपल्याला फसवण्याचे काम केले. त्यांना मी जे वाटलो होतो, तसा मी नाही हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे मला वेळ द्या. एकदा जर गाळात पाय फसला आणि वाट सोडून पाय पडला तर निघणार नाही. समाज फसला तर मी स्वतला आयुष्यभर माफ करणार नाही.
– मनोज जरांगे पाटील, मराठा नेते.