फोटो - सोशल मीडिया
जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला जात होता. त्यानुसार, आता मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मनोज जरांगे सोमवारी मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी सरकारकडे रेटून धरली आहे.
मनोज जरांगे म्हणाले, ‘आम्ही सरकारकडे 9 ते 10 मागण्या दिल्या आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करा. त्यात कोणतीही अडवणूक करु नये. ज्या कुणाला सत्तेची खूप मस्ती आहे, त्यांना स्पष्ट सांगतो. नंतर आमच्या नावाने तक्रार करू नका. तुम्हाला आत्ताच संधी आहे. मला यात राजकारण करायचे नाही. मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचे नाही. या उपोषणाच्या माध्यमातून आणखी एक संधी सरकारला देत आहे. नंतर आमच्या नावाने आरडाओरड करायची नाही’, असे जरांगे म्हणाले.
निवडणुकीशी घेणेदेणे नाही
मी आंदोलन करतो, कोणाची वाट बघत नाही, निवडणुकीशी आम्हाला देणे घेणे नाही. राजकारणाचा एकही शब्द बोलणार नाही. सरकारने आरक्षण दिले नाही तर त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. भाजपमधील काही माकडे आहेत, त्यांना सांगा की मनोज जरांगे फक्त आरक्षणाच्या मागणीसाठी बसलाय.
– मनोज जरांगे, मराठा नेते.
राजकारणाकडे जायचे नाही
मराठा, कुणबी एक आहेत, असा जीआर लवकरात लवकर काढा. तसेच हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करा. आम्ही राजकारण करू नये असे वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा. तुम्ही या किंवा येऊ नका. आपण आपली प्रक्रिया राबवत असतो, कोणी या म्हणून आंदोलन नसते. फूट पाडणे त्यांचे कामाचे आहे, मला राजकारणाकडे जायचे नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.