Photo Credit : Team Navrashtra
मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर सकल मराठा समाजाच्या आंदोलकानी काल घेराव घातला होता. उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही, अशी आग्रही मागणी या आंदोलकांची होती. पण या आंदोलन कोणाच्या सांगण्यावरून झाले असेल, यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खुलासा केला आहे. “उद्धव ठाकरेंच्या घरासमोर मराठा आंदोलकांचे आंदोलन हा देवेंद्र फडणवीसांचा टच असणार आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच हे आंदोलन झाले असावे, असा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे. याचवेळी फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात असेपर्यंत मराठी माणसाला सुख मिळणार नाही. मराठी माणसाला शांतता आणि सुख हवे असेल तर फडणवीसांना सत्तेतून काढावे लागेल, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
याचवेळी त्यांनी शिंदे-फडणवीस आणि पवार यांच्या वेशांतरावरूनही थेट गृहमंत्रालयावर आरोप केले आहेत. ‘हुडी घालून, मौलवींचे वेशांतर करून मुंबई- दिल्ली विमानतळावरून प्रवास करणारे हे अल रशीदची पोर आहेत. सत्तांतरावेळी, सत्तानाट्यावेळी खोटी नावे, खोटे पॅनकार्ड, आधारकार्ड, पासपोर्ट वापरून दिल्लीला गेले. त्यांना विमानतळावरून कसे सोडण्यात आले. सीआरपीएफच्या कमांडरला केंद्राच्या सुचना असल्याशिवाय बनावट नावे असलेली विमानतळावरून जाऊच शकत नाहीत. सीआरपीएफच्या कमांडरला गृहमंत्रालयाचा खास आदेश असल्याशिवाय त्यांना विमानतळावरून सोडण्यात येणार नाही,’ अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा तोफ डागली आहे.
माध्यामांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाणा साधला आहे. ज्यावेळी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सत्तांतर आणि सत्तानाट्यावेळी जी वेशांतरे करून विमानतळावरून प्रवास करत होते, हे गृहमंत्री अमित शाहांना माहिती होते. अमित शाहांनीच त्यांना विमानतळावरून सोडायला लावले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.तसेच, राष्ट्रीय सरक्षा सल्लागारही या कटात सहभागी असू शकतात. अजित डोबाल काय करत होते. मुंबई, दिल्ली विमानतळावर असे वेशांतर करून लोक फिरत असताना ते काय करत होते. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असताना डोबाल यांना कळले नाही का, मग त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमलाही असेच सोडले का, असा खडा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला आहे. याच वेळी आमदार सुनील तटकरे यांनाही हा फिरता रंगमंच, गद्दार कितीही स्वाभिमानाचा मुखवटा लावला तरी त्याचा काही फायदा होणार नाही. अजित पवारांना अडचणीत आणण्याचे काम तटकरे करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.