
माथेरानमध्ये दूषित पाणी थेट नळातून? साथीच्या आजारांचा धोका, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तलावातील पाणी पूर्णपणे गढूळ झाले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया करूनच नागरिकांना वितरित केले जाते. मात्र प्रत्यक्षात नळाद्वारे येणारे पाणी दूषित आणि गढूळ असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पारटे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर गंभीर आरोप करत जलशुद्धीकरणाची प्रक्रिया योग्य प्रकारे होत नसल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाणी शुद्धीकरण केंद्रात पूर्ण प्रक्रिया न करताच थेट शहरात पाणी सोडले जात आहे. तसेच पाणीपुरवठ्याची जबाबदारी खासगी ठेकेदाराकडे देण्यात आली असून, आवश्यक जंतुनाशकांचा वापर न करताच पाणी वितरित केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
याशिवाय, माथेरानसारख्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळी कार्यरत असलेले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी केवळ पाणीपट्टी वसूल करण्यापुरतेच येतात, असा आरोपही पारटे यांनी केला. सहायक अभियंता आणि शाखा अभियंता हे पूर्णवेळ शहरात उपलब्ध नसल्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण राहत नसल्याची टीकाही करण्यात आली आहे. दरम्यान, माथेरान नगरपरिषदेकडून करण्यात आलेल्या पाणी तपासणीत सुमारे 80 टक्के नमुने दूषित आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून, दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि इतर साथीचे आजार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कामकाजाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून सुरक्षित आणि शुद्ध पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पारटे यांनी केली आहे.
Matheran Accident : माथेरानहून परतणाऱ्या पर्यटकांवर संकट; ओव्हरलोड टेम्पो घाटात कलंडला, सात जण जखमी