
म्हसवड, सातारा, पोलीस, जयकुमार गोरे, महाराष्ट्र पोलीस, सातारा बातम्या, Mhaswad, Satara Police, Maharashtra Police, Breaking News, Local News Satara,
Satara Police : माण तालुक्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या म्हसवड शहरातील पोलीस ठाण्यात गेल्या २ महिन्यांपासून अधिकारीच नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पोलीस ठाण्याला अधिकारीच नसल्याने सध्या हे पोलीस ठाणे भटक्या श्वानांचा अड्डा बनल्याचे चित्र आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बालेकिल्ल्यातील हे अत्यंत महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. याच म्हसवड पोलीस ठाणे हद्दीत ४२ छोट्या-मोठ्या गावांचा समावेश आहे, तर या पोलीस ठाणे हद्दीत ८ बीट येत असून त्यासाठी ५१ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. दोन पोलीस अधिकारी या ठिकाणी कार्यरत असतात, ज्यामध्ये एक पी.एस.आय. व एक ए.पी.आय. अशा २ अधिकाऱ्यांची नियुक्ती असते. मात्र, १४ फेब्रुवारी रोजी या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले ए.पी.आय. अक्षय सोनवणे यांची अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांची बदली होऊन जवळपास दोन महिने लोटले तरी अद्यापही त्यांच्या जागी एक सक्षम व जबाबदार अधिकारी न आल्याने पोलीस ठाणे सध्या ‘रामभरोसे’ सुरू असल्याचा प्रत्यय येत आहे. शहरात ११ एप्रिल रोजी महात्मा फुले व १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होत असते. या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची प्रमुख जबाबदारी ही म्हसवड पोलिसांची असते. ही जबाबदारी यंदाही चोखपणे पार पाडण्यासाठी जयंतीपूर्वीच येथे जबाबदार पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी, अशीच अपेक्षा सर्वसामान्य म्हसवडकर जनता करीत आहे.
वास्तविक पाहता, सातारा जिल्ह्यामध्ये म्हसवड हे एकमेव असे पोलीस ठाणे आहे, जिथे गेल्या २ महिन्यांपासून पोलीस अधिकारी नाही. सातारा पोलीस मुख्यालयात जवळपास असे ११ स.पो.नि. अतिरिक्त आहेत की ज्यांच्याकडे अद्याप कोणत्याही पोलीस ठाण्याचा अधिकृत कार्यभार नाही, अशीही माहिती समोर येत आहे. मात्र, त्यांच्या नियुक्तीला हिरवा कंदील अद्याप मिळाला नसल्याने ते मुख्यालयातच थांबलेले असल्याचे समजते.
खरे तर सातारा जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेले म्हसवड शहर आहे, या शहराच्या पुढे सोलापूर जिल्हा सुरू होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत आजवर मोठ्या ताकतीने हे म्हसवड शहर उभे राहिलेले आहे. ना. गोरे हे ज्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्या जिल्ह्यात त्यांना सातत्याने याच म्हसवड शहरातून जावे लागते. अशा महत्त्वपूर्ण शहरातील पोलीस ठाण्याला अधिकारी नसणे, ही पोलीस दलासाठीही खेदाची बाब आहे.
यापूर्वी येथील पोलीस ठाण्यात आपली वर्णी लागावी यासाठी अनेक अधिकाऱ्यांचे ‘लॉबिंग’ सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी सुद्धा या ठिकाणी आपली वर्णी लागावी यासाठी अनेकजण ‘फिल्डिंग’ लावून बसलेले आहेत. मात्र येथे नेमका कोणाचा नंबर लागतो, हे पाहणे जरी औत्सुक्याचे ठरणार असले, तरी येथे जो अधिकारी येईल तो निश्चितच ना. गोरे यांच्या मर्जीतील असणार यात तिळमात्र शंका नाही. तरीही, तो अधिकारी सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा असावा, एवढीच माफक अपेक्षा सर्वसामान्य म्हसवडकर जनतेतून व्यक्त होत आहे.
प्रभारीवरच सर्व भार :
गेल्या २ महिन्यांपासून म्हसवड पोलीस ठाण्याचा अतिरिक्त भार हा दहिवडी येथील स.पो.नि. दत्तात्रय दराडे यांच्याकडे सोपवण्यात आला असला, तरी त्यांची दहिवडी-म्हसवड अशी धावपळ करताना मोठी दमछाक होत आहे. दहिवडी, म्हसवड व शिखर शिंगणापूरचे आऊटपोस्ट असा संयुक्त कारभार सध्या दराडे पाहत आहेत.
सेनापती नसल्यावर ज्याप्रमाणे सैन्य निर्धास्त होते, अगदी त्याप्रमाणेच म्हसवड पोलीस ठाण्याची अवस्था झाली आहे. येथे प्रमुख अधिकारीच नसल्याने सर्व कार्यरत कर्मचारीही निर्धास्तपणे वावरत आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यात कोण येते-जाते याकडेही त्यांचे लक्ष नाही. याचा फायदा चक्क भटक्या श्वानांनी घेतला असून भरदिवसा भटके श्वान पोलीस ठाण्यात निवांतपणे पडलेले दिसत होते. त्यांना बाहेर काढण्याची साधी तसदी कोणीही घेत नसल्याने, ‘हे पोलीस ठाणे भटक्या श्वानांचा अड्डा तर बनले नाही ना?’ असा प्रश्न येथे येणाऱ्यांना पडल्याशिवाय राहत नाही.