लासलगाव : नाफेड व एनसीसीएफ यांच्यामार्फत कांदा खरेदीत गैरकारभार झाल्याचा आरोप करत, केंद्र सरकारने त्वरित कारवाईसह कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी, यासाठी वाहेगावचे कांदा उत्पादक शेतकरी निवृत्ती न्याहारकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी नाफेड आणि एनसीसीएफच्या गैरकृत्यांचा पाढाच वाचला आहे.
काही प्रोड्यूसर कंपन्या किंवा नाफेड, एन.सी.सी.एफ. व काही प्रमाणात शेतकरी यांनी खरोखर कांदा विक्री केली असेल, तर त्यांचा नक्कीच सन्मान व्हावा. मात्र, ज्या घटकाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची सगळी यंत्रणा उभारली, त्यांची उच्चस्तरीय चौकशी ही केंद्रातील एनआयए किंवा ईडी यांच्याकडून होणे गरजेचे आहे. तरच खरे सूत्रधार चौकशीत समोर येतील, यासह अनेक मुद्दे मांडून त्यांनी कांदा प्रश्नावर प्रकाशझोत टाकला आहे.
क्रिसिलने दिला होता अहवाल
जुलै 2023 मध्ये क्रिसिलने कांद्याच्या तुटवड्यावर अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानुसार देशात आगामी काळात कांद्याचा तुटवडा असेल. त्यानंतर काही दिवसांत सरकारने जाहीर केले की, नाफेड आणि एनसीसीएफ कांदा खरेदी करतील. कांदा निर्यातबंदी लागू केली.