उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गट यांच्या होणाऱ्या दसरा मेळाव्यांकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava) शिवतीर्थावर आयोजित करण्यात आला होता. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा हा बीकेसीमधील मैदानात पार पडला. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नवनीत राणा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
— Navnit Ravi Rana (@navneetravirana) October 5, 2022
नवनीत राणा म्हणाल्या की, “उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे फक्त बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात विचारांचे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडले ते ऐकण्यासाठी लोक त्यांच्या सभेत आले होते. एकनाथ शिंदे हेच बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा पुढं नेऊ शकतात.”
त्यांनी सांगितलं की, उद्धव ठाकरे हे वारंवार बाप चोरला असं सांगतात पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे फक्त बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात. विचारधारा ही एकनाथ शिंदेंसोबत आहे. उद्धव ठाकरेंचे संतुलन पूर्ण बिघडलं आहे, हे जनतेने पाहिलंय. कारण सभेत उद्धव ठाकरे फक्त फिल्मचे डायलॉग सांगत होते. अडीच वर्ष उद्धव ठाकरे घरात बसले होते त्यांनी फक्त फेसबुक लाईव्ह केलं, बाळासाहेबांचे विचार हे खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेंसोबत आहेत.