मोठी बातमी! ‘MPSC च्या सर्व परीक्षा मराठीत होणार’, मुख्यमंत्री फडणवीसांची विधान परिषदेत माहिती
विधानपरिषदेचे सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षा मराठीत घेण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. आमदार नार्वेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची राज्य सरकारची योजना असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत एक्सवरही पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यामुळे MPSC ची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी आणखी सोपी होण्याची शक्यता आहे.
एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीत !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत राज्यात एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची योजना राज्य सरकार करत असल्याची माहिती दिली.
विधानपरिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षा मराठीत घेण्यासंदर्भात…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 12, 2025
देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक्सवर पोस्ट करत म्हटले की, “विधानपरिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षा मराठीत घेण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. सध्या अभियांत्रिकी आणि कृषी तांत्रिक पदांच्या परीक्षा इंग्रजीत घेतल्या जातात, कारण संबंधित पुस्तके मराठीत उपलब्ध नाहीत. मात्र, आता अभियांत्रिकी शिक्षण मराठीत घेण्यास परवानगी मिळाल्याने लवकरच या अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत उपलब्ध होतील. त्यानुसार, सर्व तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीत घेण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे.”
याचबरोबर आज विधानपरिषदेचे सदस्य सतेज ऊर्फ बंटी पाटील, अभिजित वंजारी, भाई जगताप, जयंत आसगावकर, राजेश राठोड, धीरज लिंगाडे, डॉ. प्रज्ञा सातव, मिलिंद नार्वेकर, सुनिल शिंदे यांनी एमपीएससी संदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी एमपीएससीमार्फत होणारी पदभरती आणि पारदर्शकता व पेपरफुटीवरही प्रश्न विचारण्यात आले होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली आहेत.
यावेळी, शासनाने रिक्त पदे भरण्यासाठी घोषणा करुनही १५ पेक्षा जास्त विभागात भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही, तसेच तलाठी व जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया राबविल्यानंतर उमेदवार पात्र होऊनही त्यांना नियुक्तीचे पत्र दिले नाही, हे ही खरे आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “तलाठी तसेच जिल्हा परिषदेतील पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जात नाहीत. तसेच नियुक्ती पत्र देण्याची कार्यवाही देखिल आयोगामार्फत केली जात नाही. त्यामुळे या विषयाचा आयोगाच्या मनुष्यबळाशी कोणताही संबंध नाही.”