
मात्र, काशिगाव स्थानकाचे काम अपूर्ण असल्यामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी काही काळ प्रलंबित राहिली. त्यानंतर प्रशासनाने अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात करून कामाला गती दिली. सध्या स्थानकाच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून साफसफाई, तांत्रिक यंत्रणांची चाचणी, साहित्य पडताळणी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक यांसारखी कामे सुरू आहेत.स्थानकावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ स्तरावरून अंतिम परवानगी मिळाल्यानंतर काशिगाव मेट्रो स्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे मिरा-भाईंदरकरांना मुंबईकडे जलद, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, काशिगाव मेट्रो स्थानक अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन यंत्रणा, विद्युत आणि पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यात आली आहे. तसेच दोन प्रशस्त तिकीट काउंटर, ग्राहक तक्रार निवारण केंद्र, डिजिटल तिकीट प्रणाली, चार धावते जिने (एस्केलेटर), लिफ्ट, आपत्कालीन गजर प्रणाली आणि आकर्षक प्रकाशयोजना यांचा समावेश करण्यात आला आहे.एकूणच, काशिगाव मेट्रो स्थानकाच्या पूर्णत्वामुळे मिरा-भाईंदर शहराच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असून, स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात महत्त्वपूर्ण बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.