
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्...; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला (फोटो सौजन्य-ChatGPT)
मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी आलेल्या एका २५ वर्षीय तरुण भाविकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दर्शनासाठी रांगेत उभे असताना अचानक प्रकृती बिघडल्यानंतर जयदीप मेघराज नेमाडे या तरुणाला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जयदीप हा मूळचा जळगाव येथील रहिवासी होता.
देखणे हे रूप दिसे! ‘श्रीमंतां’च्या दर्शनासाठी गर्दीचा महापूर; पुण्यनगरीत भविकांचा उत्साह
ही घटना १७ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ११.४० वाजता घडली. जयदीप दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या मित्रांसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला होता. दर्शनासाठी रांगेत उभा असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती मित्रांनी दिली.
अस्वस्थ वाटू लागल्यानंतर जयदीप मित्रांना सांगून दर्शनाच्या रांगेतून बाहेर पडला. त्याची प्रकृती खालावत असल्याचे लक्षात आल्यानंतर उपस्थित पोलिसांनी त्याला तातडीने मदत कक्षात नेले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्याला रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जयदीपचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे.
जयदीप जळगावमधील शिरसोली रोड परिसरातील जीवनमोती सोसायटीत राहणाऱ्या नेमाडे कुटुंबातील होता. त्याचे वडील मेघराज सुभाष नेमाडे हे नेमाडे ट्रान्सपोर्टचे संचालक असल्याचे सांगण्यात आले आहे. जयदीप त्यांचा एकुलता एक मुलगा होता.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर जयदीप पुण्यात नोकरी करत होता. त्याच्या आईचे सुमारे १२ वर्षांपूर्वी निधन झाले होते. आता जयदीपच्या अचानक मृत्यूमुळे त्याच्या वडिलांवर मोठा आघात झाला आहे. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह जळगावला नेण्यात आला आणि तेथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लालबागचा राजा हे मुंबईतील सर्वाधिक गर्दी होणाऱ्या गणेश मंडळांपैकी एक आहे. दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येतात. गेल्या काही वर्षांत दर्शन रांग, गर्दीचे व्यवस्थापन आणि स्वयंसेवकांच्या वर्तनाबाबत काही भाविकांकडून आरोप करण्यात आले आहेत.
विशेषतः सामान्य भाविकांना दीर्घकाळ रांगेत थांबावे लागत असल्याची तक्रार अनेकदा सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे. दुसरीकडे काही व्हीआयपी आणि सेलिब्रिटींना तुलनेने वेगळी वागणूक मिळत असल्याचा आरोपही काही भाविकांनी केला आहे. मंडळाने मात्र व्हीआयपी पाससाठी पैसे घेतले जात असल्याचे आरोप यापूर्वी फेटाळले आहेत.
दर्शनादरम्यान काही महिला भाविकांशी धक्काबुक्की किंवा गैरवर्तन झाल्याच्या आरोपांची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. १० सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भात सुनावणी झाली असून पुढील सुनावणी ६ ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती आहे.दरम्यान, जयदीप नेमाडेच्या मृत्यूच्या घटनेचा आणि दर्शन व्यवस्थापनाबाबत पूर्वीपासून सुरू असलेल्या आरोपांचा थेट संबंध असल्याचे सध्या उपलब्ध माहितीतून सिद्ध झालेले नाही.