
रक्तदानासाठी 'आर्ट गॅलरी'तून घातली कल्पक साद! एकात्मता, अध्यात्म आणि राष्ट्रीय भावनेतून जनजागृती करण्यावर दिला जाणार भर
“दानाचे नव्हे त्यागाचे असे। कार्य सर्व महाभागांचे असे ।।”
“हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई। सबको खून जरूरी है भाई ।।”
“धर्माच्या नावावर का हो करता रक्ताचा सडा? हेच रक्त ‘दान’ करून उपयोगी पाडा!”
अशा हृदयस्पर्शी आणि विचारप्रवर्तक घोषवाक्यांतून रक्तदानाचा संदेश देत महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यभरातील रक्तपेढ्यांसाठी एक अभिनव जनजागृती उपक्रम हाती घेतला आहे. ‘अँन आर्ट गॅलरी फॉर नोबल कॉज ऑफ ब्लड डोनेशन’ या संकल्पनेतून एकात्मता, अध्यात्म, धार्मिक समन्वय आणि राष्ट्रीय कर्तव्यभावना यांचा संगम साधत स्वेच्छा रक्तदानाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे ही अध्यात्मिक, ओवीबद्ध कवन परिषदेच्या सहाय्यक संचालक डॉ. पुरुषोत्तम पुरी यांनी रचली आहेत. त्यांचा अभंग, भारूड, कविता यांचा गाढा अभ्यास असून फक्त रक्तदाना साठी त्यांनी अशा अनेक ओव्या रचल्या आहेत. हे फलक म्हणजे डॉ. पुरी यांच्या कामातील दोन टक्के भाग असून अनेक गाणी, व्हीडिओ रक्तदानाचे महत्व सांगत आहेत. परिषदेचे सहा. संचालक डॉ. पुरी यांनी गेल्या ३० वर्षांतील अनुभवातून पोस्टर्सची मालिका तयार केली आहे.(फोटो सौजन्य – istock)
-जसे जळाविना मासे, जसे पाण्याविना रोपटे, तसे रक्ताविना मानव, या ओळींतून रक्ताचे जीवनावश्यक महत्त्व अधोरेखित केले आहे. तर रक्तदान एकात्मतेचे प्रतीक हा संदेश देत धर्म, जात, पंथ यांच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या बंधनाची जाणीव करून दिली आहे. विशेष म्हणजे पैसे रक्तव दान करा! असा प्रभावी संदेश देत दानपेटीच्या पारंपरिक संकल्पनेलाच नवा अर्थ दिला आहे. धार्मिक भावनांना सकारात्मक वळण देत चर्माच्या नावावर रक्त सांडण्याऐवजी तेच रक्त दान करून जीव वाचवा, अशी साद या पोस्टर्समधून घालण्यात आली आहे. रक्तदानाला ‘त्याग’ आणि ‘श्रीगणेशा’चा पवित्र आरंभ मानत सामाजिक आध्यात्मिक संदर्भ जोडले गेले आहेत. “रक्ताचीये बळे, चाले जीवनाचे बाहुले या काव्यमय ओळींतून जीवनचक्र रक्तावर अवलंबून असल्याचा प्रभावी संदेश दिला आहे.
राज्यातील रक्तपेढ्यांनी पारंपरिक आवाहनांपलीकडे जाऊन अशा सर्जनशील अशा माहिती, शिक्षण, संवाद अशा माध्यमांचा करणे काळाची गरज असल्याचे डॉ. पुरी यांना वाटते. स्वेच्छा रक्तदानाच्या चळवळीला नवा वेग देण्यासाठी ही ‘आर्ट गॅलरी’ संकल्पना उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकूणच, रक्तदानाला केवळ वैद्यकीय गरज न मानता सामाजिक, आध्यात्मिक आणि राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सादर करण्याचा राज्य रक्त संक्रमण परिषदेचा हा कल्पक प्रयत्न ठरत आहे.
८८ कोणत्याची धर्माचा, वयाच्या व्यक्ती मध्ये अध्यात्म असते. एखादी व्यक्ती रक्तदान करते म्हणजे त्ती अध्यात्मात मोडत असते, त्या व्यक्तीत चांगुलपणा असतो म्हणून तो दान करतो. दानापेक्षा मोठं पुण्य ते काय असते? म्हणून रक्तदान करण्यास प्रेरित केले जात आहे, असे मत – डॉ. पुरुषोत्तम पुरी, सहा. संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद यांनी व्यक्त केले आहे.