
चेंबुर दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या नगरसेविका ॲक्शन मोडमध्ये; वडाळ्यात पावसाळी कामांचा घेतला आढावा
चेंबूर येथे शाळकरी मुलांच्या बसेसवर झाड कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर मुंबईत पावसाळी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध भागांतील पावसाळी समस्यांवर लक्ष केंद्रित करत शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी आपल्या विभागात प्रत्यक्ष पाहणी आणि आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
मुसळधार पावसामुळे वडाळा परिसरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. काही ठिकाणी रस्त्यांना अक्षरशः नाल्याचे स्वरूप आले होते. या परिस्थितीची गंभीर दखल घेत नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी संबंधित बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अधिकाऱ्यांची तातडीने भेट घेतली. त्यांनी पाणी साचण्याची कारणे, नालेसफाईची स्थिती आणि आपत्कालीन उपाययोजनांचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या.
यानंतर मनपा प्रशासनाने तातडीने पंपांच्या साहाय्याने साचलेले पाणी बाहेर काढण्याचे काम हाती घेतले. तसेच नालेसफाई, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि नागरिकांना होणारी गैरसोय कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. परिसरातील धोकादायक झाडांची तपासणी, फांद्यांची छाटणी आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठीही प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या.
तृष्णा विश्वासराव या स्वतः विविध ठिकाणी भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी करत आहेत. पावसाळ्यात नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, वाहतूक सुरळीत राहावी आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद मिळावा, यासाठी त्या सातत्याने प्रशासनाशी समन्वय साधत आहेत.
चेंबूरमधील दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात असून पावसाळ्याच्या काळात प्रत्येक विभागात नियमित पाहणी, नालेसफाई, झाडांची तपासणी आणि जलनिस्सारण व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सतर्कपणे काम करत असल्याचे या पाहणीतून दिसून येत आहे.