
'स्वीकृत 'ची निवड लांबणीवर? इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा सावध पवित्रा (फोटो सौजन्य-Gemini)
वसई : वसई-विरार महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची संख्या दहा असून त्यातील सहा सत्ताधारी बहुजन विकास आघाडी तर चार भाजपच्या कोट्यातील नगरसेवक असणार आहे. स्वीकृत नगरसेवकपदासाठी दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नाराजी टाळण्यासाठी स्वीकृत नगरसेवकांची निवड लांबणीवर पडेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
महापालिका निवडणुकीत उमेदवारी देताना दोन्ही पक्षांकडून काही इच्छुकांना स्वीकृत नगरसेवक करू, असे आश्वासनही देऊन त्यांची मनधरणी करण्यात आली होती. त्यामुळे बविआ आणि भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. यानिवडीत नाराजांची संख्या वाढण्याची भिती असणार आहे. परिणामी दोन्ही पक्षांना स्वीकृत नगरसेवकांची निवड करताना मोठे आव्हान असणार आहे. यापार्श्वभूमीवर सत्ताधारी बविआ आणि भाजपकडून सावध पवित्र घेतला जात आहे. महत्वाची बाब म्हणजे स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी कोणतीही कालमर्यादा नाही. त्याचा फायदा उचलत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीची प्रक्रिया काही काळ पुढे ढकलणे दोन्ही पक्षांच्या पथ्यावर पडणार आहे. काही काळानंतर इच्छुकांची संख्या कमी कमी होऊन आपल्या मर्जीतीलच स्वीकृत नगरसेवक करणेही सोपे जाणार आहे.
आधीच इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. त्यातच पराभूतांचा विचार केला तर नाराजांची संख्या वाढण्याचा धोका आहे. बहुजन विकास आघाडीकडून महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जाण्याची खूपच कमी आहे. आम्ही विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यावरही काम करत आहोतच ना. मग, पराभूतांनीही पक्षाचे काम करून पुढच्यावेळी निवडून यावे, असे बविआ नेत्यांचे धोरण ठरल्याचे सांगितले जाते. तर भाजपचीही अशीच रणनिती असणार आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुकांची आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
साडेपाच वर्षानंतर महापालिकेचा कारभार लोकनियुक्त नगरसेवकांच्या हाती गेला आहे. महापालिका निवडणूकीत बहुजन विकास आघाडी आणि भाजपामध्येच सरळ लढत झाली. बविआने काँग्रेस, मनसेसोबत युती करत ७१ जागा जिंकत महापालिकेची तिसऱ्यांदा सत्ता काबिज केली आहे. तर महायुतीत भाजपने ४३ आणि शिंदे गटाने एक जागा जिंकत पहिल्यांदा महापालिकेत विरोधी पक्षांने जागा जिंकण्याचा विक्रम केला आहे. वसई विरारमध्ये भाजप प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे येत असून बविआला सक्षम पर्याय निर्माण करण्यात भाजपने यश मिळवले आहे.