
आयुक्तांच्या दौऱ्यापूर्वीच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई
नीता परब, मुंबई : भांडुप रेल्वे स्थानक (पश्चिम) परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासह पादचाऱ्यांना सुरक्षित व मोकळा मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी ‘अर्बन डिझायनर’च्या माध्यमातून वाहतूक आराखडा तयार करण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिल्या आहेत, त्या अनुषंगाने, शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांच्या उपस्थितीत आयुक्तांनी भांडुप स्टेशन रोड परिसराची पाहणी करून ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांचाही आढावा घेतला.
भांडुप रेल्वे स्थानक परिसरात बेस्ट बससाठी सुरक्षित मार्गिका उपलब्ध व्हावी, वाहतूक कोंडी कमी व्हावी तसेच पादचाऱ्यांना अडथळामुक्त रस्ता मिळावा, यासाठी आयुक्त अश्विनी भिडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी परिसरातील वाहतुकीची सद्यस्थिती लक्षात घेऊन अर्बन डिझायनरच्या माध्यमातून सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी नगरसेविका राजोल संजय पाटील, उपायुक्त संतोषकुमार धोंडे व सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद उपस्थित होत्या.
दरम्यान, आयुक्त भांडुप, मुलुंड परिसरात पाहणीसाठी येणार असल्याने पालिका प्रशासनाची सकाळपासूनच मोठी धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसून आले. आयुक्तांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालिका अधिकाऱ्यांनी अचानक अनधिकृत फेरीवाले व अनधिकृत बॅनरविरोधात कारवाई सुरू केली. अनेक अनधिकृत बॅनर हटविण्यात आले, तर फुटपाथवर बसणाऱ्या फेरीवाल्यांना हटविण्यात आले. काही ठिकाणी पक्के शेडही काढून टाकण्यात आले. नेहमी सकाळच्या वेळेत फुटपाथवर मोठ्या संख्येने दिसणारे फेरीवाले आज सकाळी सातच्या सुमारास मात्र दिसून आले नाहीत. त्यामुळे परिसरातील फुटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Lek Ladki Yojana: मुंबईतील 3 हजार 563 लाभार्थींना मिळणार लाभ; अंतिम लाभ मिळण्यासाठी काय आहे अट?
आयुक्तांच्या पाहणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार किंवा अनधिकृत फेरीवाले निदर्शनास येऊ नयेत, यासाठी पालिका प्रशासनाकडून आधीच संबंधितांना सूचना देण्यात आल्याची चर्चा परिसरात होती. मात्र, पालिका आयुक्त येणार आहेत म्हणून अनधिकृत फेरीवाले व अनधिकृत बॅनरवर कारवाई केली जाते, तर अशीच कारवाई दररोज का केली जात नाही? असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. फुटपाथ अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना रोज त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे केवळ वरिष्ठ अधिकारी पाहणीसाठी येणार असल्याने दिखाऊ कारवाई न करता अनधिकृत फेरीवाल्यांवर नियमित आणि सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी परिसरातील वाहतूक, पादचारी व फेरीवाला समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून या भागातील नियोजन अधिक प्रभावी करण्याची गरज अधोरेखित केली. भांडुप स्टेशन परिसरात पादचाऱ्यांना सुरक्षित व मोकळा मार्ग मिळण्याबरोबरच बेस्ट बसच्या वाहतुकीलाही अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.