
DNA आधारित उपचारांची नवी पहाट! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अँटिबायोटिक उपचार पद्धतीत बदलाची चिन्हे
राम खांदारे , मुंबई : संसर्गजन्य आजारांवरील उपचार पद्धतीत मोठा बदल घडवून आणण्याची क्षमता असलेले डीएनए-आधारित तंत्रज्ञान नवीन क्रांती घडविण्यास सज्ज झाले आहे. आयआयटी मुंबई येथील संशोधकांनी विकसित केलेली ही पद्धत पारंपरिक अँटिबायोटिक्सना पूरक ठरत असून भविष्यातील उपचारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते. न्यूमोनिया, क्षयरोग, मूत्रमार्गातील संसर्ग तसेच रक्तातील संसर्ग अशा विविध आजारांवर अँटिबायोटिक्सचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र, वाढत्या अँटिबायोटिक रेसिस्टन्समुळे उपचार अधिक कठीण होत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर डीएनए-आधारित ‘अॅप्टामर’ तंत्रज्ञानाकडे संशोधकांनी आशेने पाहण्यास सुरुवात केली आहे.
या संशोधनात डीएनएच्या लहान साखळ्यांचा वापर करून जीवाणूंनी तयार केलेल्या प्रतिकारक विकरांना निष्क्रिय करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे अँटिबायोटिक्सना पुन्हा प्रभावीपणे कार्य करता येते. विशेष म्हणजे, या डीएनए अॅप्टामर्सना ‘लिपोसोम’ नावाच्या सूक्ष्म संरचनेत बंदिस्त करून ते थेट जीवाणूंमध्ये पोहोचवण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ दिसून आली. डीएनए-आधारित उपचार ही केवळ प्रयोगशाळेतील संकल्पना राहिलेली नसून योग्य पद्धतीने वापरल्यास ती भविष्यातील उपचारपद्धतीचा महत्त्वाचा भाग ठरण्याची शक्यता प्रा. रुची आनंद यांनी व्यक्त केली.
यात प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये या तंत्रज्ञानामुळे प्रतिरोधक जीवाणूंवर अँटिबायोटिक्सचा परिणाम अधिक प्रभावी झाल्याचे दिसून आले. विशेषतः स्टॅफिलोकोकस ऑरियस सारख्या जीवाणूंवर सकारात्मक परिणाम नोंदवण्यात आला आहे. तज्ञांच्या मते, ही पद्धत भविष्यात वैयक्तिक उपचारांसाठीही उपयुक्त ठरू शकते. मात्र, यासाठी प्राण्यांवरील आणि मानवी चाचण्यांची आवश्यकता आहे. या संशोधनात लीना बडगुजर, दामिनी साहू, स्वागता पात्रा यांनीहि सहभाग घेतला.
‘नवीन औषधे विकसित करण्याऐवजी सध्याच्या औषधांना अधिक प्रभावी बनवणे हे डीएनए आधारित तंत्रज्ञान अधिक व्यावहारिक आणि जलद मार्ग ठरू शकतो.’आयआयटी मुंबई, केमिस्ट्री डिपार्टमेंट, प्रा. पी. आय. प्रदीपकुमार यांनी माहिती दिली.
*डीएनए अॅप्टामर्सद्वारे जीवाणूंची प्रतिकारशक्ती कमी करण्याचा प्रयत्न
*लिपोसोम तंत्रज्ञानामुळे औषध पोहोचवण्याची कार्यक्षमता वाढली
*अँटिबायोटिक रेसिस्टन्सवर मात करण्यासाठी नवी दिशा
*भविष्यात पर्सनलाइज्ड उपचार शक्य होण्याची शक्यता
*अजून क्लिनिकल चाचण्या बाकी, पण प्राथमिक निष्कर्ष उत्साहवर्धक
Mumbai Local: मध्य रेल्वेवरील गर्दी कमी होणार! आता ठाणे-डोंबिवली मार्गावरून धावणार 15 डब्यांची लोकल