घणसोलीत पाण्यासाठी नागरिकांचा संताप अनावर! डोक्यावर हंडे घेऊन महापालिका कार्यालयावर धडक, रस्त्यावर आंघोळ-दात घासत अनोखा निषेध
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अपुऱ्या आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या घणसोलीतील नागरिकांनी गुरुवारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या घणसोली विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढला. पिण्याच्या आणि वापराच्या पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवण्यासाठी संतप्त रहिवाशांनी डोक्यावर हंडे घेऊन प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांनी चक्क रस्त्यावर बसून आंघोळ करत आणि दात घासत महापालिकेच्या कारभाराचा अनोखा निषेध नोंदवला.
शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक सौरभ शिंदे आणि समाजसेवक सुनील मस्कर यांच्या नेतृत्वाखाली हा ‘हंडा मोर्चा’ आयोजित करण्यात आला होता. गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण घणसोली परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. महापालिकेकडून वेळेवर पाणी पुरवले जात नसल्याने दैनंदिन कामे खोळंबली असून नागरिकांचे हाल होत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी ही कायमस्वरूपी सोय नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
पाण्यासाठी वारंवार पायपीट करावी लागत असल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. महापालिकेकडून वेळेवर पाणी पुरवले जात नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर शेकडो महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत पालिका कार्यालयाला वेढा घातला. आंदोलनकर्त्यांनी चक्क रस्त्यावर बसून आंघोळ करत आणि दात घासत महापालिकेच्या कारभाराचा अनोखा निषेध नोंदवला. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाला तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. पाणीप्रश्न लवकर न सुटल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालिका कार्यालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
“पाणीप्रश्नावरून घाणेरडे राजकारण सुरू आहे. जे काही राजकारण करायचे असेल ते माझ्यासोबत करा, पण निष्पाप व गरीब जनतेला पाण्यासाठी वेठीस धरू नका. नागरिकांचा पाणीप्रश्न सुटणार असेल, तर मी नगरसेवकपदाचा राजीनामा देण्यासही तयार आहे,” असा इशारा या वेळी नगरसेवक सौरभ शिंदे यांनी दिला.






