अनधिकृत बॅनरबाजीचा नवी मुंबईत धुमाकूळ, पालिकेच्या बुडीत महसूलाला जबाबदार कोण?
उत्सवाच्या नावाखाली शहरातल्या मुख्य चौकांत, उड्डाणपुलांवर आणि गर्दीच्या रस्त्यांवर धोकादायक बॅनरचे पेव पसरले आहे. वारा-पावसाने हे अवाढव्य फलक कोसळून कुणाचा नाहक बळी गेला, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुभाजकांमध्ये देखील बॅनर लावले गेले असून, अनेक ठिकाणी वाहनांना आडकाठी होत आहे.पादचाऱ्यांच्या जिवाशी खेळणारे हे अनधिकृत फलक हटवण्याचे धाडस पालिका प्रशासन दाखवणार का अस प्रश्न उपस्थित होत आहे.
पालिकेच्या सभागृहात सत्ताधारी व विरोधक आपणच या शहराचे “हितचिंतक” असल्याचे दाखवत असतात. मात्र सण उत्सवांच्या वेळी बॅनरबाजी करताना ही जबाबदारीची जाणीव जाते कोठे असा प्रश्न उपस्थित होतो.
एखाद्या सामान्य नागरिकाने छोटासा बोर्ड लावला तरी त्याच्यावर धडक कारवाई करणारे महापालिका अधिकारी, राजकीय पक्षांच्या या भव्य बेकायदेशीर बॅनरसमोर मात्र झुकताना दिसत आहेत. प्रशासनाचा हा उघड दुटप्पीपणा दिसून येत असून, पालिका प्रशासनाचं अशा अनधिकृत बॅनरबाजीला अभय देऊन पालिकाच स्वतःचा महसूल बुडवत असल्याचे सिद्ध होते.
“नियमांनुसारच कारवाई करण्यात येईल. ज्या ठिकाणी आवश्यक परवानगी नसेल, तेथील अनधिकृत बाबी तातडीने काढून टाकण्यात येतील आणि संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल. कारवाई करताना कोणत्याही राजकीय पक्षाचा भेदभाव केला जाणार नाही”, अतिरिक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका डॉ. राहुल गेटे यांनी माहिती दिली.






