Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या
वाई : वाई शहरातील प्रशासकीय इमारतीसमोर बावधन गावातील तामखडा क्षेत्राच्या वादावरून सुरू असलेल्या उपोषणाला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रशासनाच्या भूमिकेविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे ८० टक्के दिव्यांग असलेला शेतकरी गेल्या दोन दिवसांपासून अन्नाचा कणही न घेता उपोषणाला बसला असताना प्रशासनाने अद्याप या प्रश्नाची गंभीर दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
डोळ्यांनी अंध आणि ८० टक्के दिव्यांग असलेला हा शेतकरी आपल्या हक्कासाठी उपोषण करत आहे. मात्र, त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असतानाही प्रशासनाने या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने ‘दिव्यांग’ शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी आंदोलन करावे लागते, यापेक्षा दुर्दैवी बाब कोणती असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, तामखडा शिवारातील क्षेत्राच्या मोजणीसाठी आज प्रशासनाचा मोठा फौजफाटा बावधन येथे दाखल झाला होता. मात्र, मोजणीची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.
२०२२ मध्ये झालेल्या चुकीच्या नकाशाच्या आधारे गट तयार करण्यात आला असून, त्यातून सुमारे १० एकर क्षेत्र खाणीसाठी मंजूर करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, ज्या गटाच्या आधारे ही प्रक्रिया पुढे नेण्यात आली, तो गटच चुकीच्या अथवा बोगस पद्धतीने तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला. ही बाब शेतकरी आणि ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर परिस्थिती चिघळली या पार्श्वभूमीवर तामखडा शिवारात मोठ्या संख्येने महिला एकत्र आल्या होत्या.
अकोल्यात शेतकऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार
दुसरीकडे, पावसाने दडी मारल्याने खरीप पिके संकटात सापडली असताना शेतकऱ्यांच्या व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने गुरुवारी बोरगाव खुर्द-डाबकी जहागीर मार्गालगत थेट शेताच्या बांधावर चार तास आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी काळ्या फिती बांधून सरकारच्या धोरणांचा निषेध केला.






