'...तरच माफी मागणार', राडा, तोडफोडनंतर कुणाल कामरा थेट बोलला
स्टँडअप कॉमेडियन कुमाल कामराच्या गाण्यावरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या विडंबनात्मक कवितेवर शिंदे गटाने आक्षेप घेत आक्रमक पवित्रा घेतला असून कामराच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री कुणाल कामराचा कार्यक्रम झालेल्या हॉटेलचीही तोडफोड केली. या सगळ्या वादानंतर कुणाल कामराने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आणि राज्यात प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ झाली. शिंदे आणि शिवसेनेचे ४० आमदार गुवाहटीला गेले होते. त्यावरून बंडावर केलेल्या उपहासात्मक कवितेमुळे कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हिंदी सिनेमामधील दिल तो पागल है या गाण्याच्या चालीवर कुणालने महाराष्ट्राच्या राजकारणावर एक कविता केली ज्यामध्ये एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडापासून ते गुवाहाटी पर्यंतचा प्रवास मांडला आहे. या गाण्यामध्ये कुणाचेही नाव घेतले नाही मात्र गद्दारचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते संतापले आहेत.
कामराचं हे उपहासात्मक गाणं व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी अंधेरीमधील त्याचा कार्यक्रम झालेल्या द हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड केली. त्याचबरोबर शिवसेनेच्या नेत्यांनी कुणाल कामराने माफी मागितली नाही तर त्याला प्रसाद देण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. या संपूर्ण वादावर आता घडामोडींनंतर कुणाल कामराने प्रतिक्रिया दिली आहे.
मला गद्दार बोलल्याचा कोणताही पश्चाताप नाही. मला न्यायालयाने जर सांगितलं तरच मी माफी मागेन, असं म्हणत कुणाल कामराने आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. तसेच त्याला विरोधकांचा पाठिंबा असल्याचा आरोप त्याने फेटाळून लावला आहे, कुणाल कामराने मुंबई पोलिसांकडे या संपूर्ण वादावरून आपली प्रतिक्रिया मांडली आहे.
कुणाल कामराने केलेल्या काव्यावरुन सत्ताधारी आक्रमक झाले असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह विरोधकांनी मात्र त्याला समर्थन दिलं आहे. कुणाल कामराने कोणाचेही नाव घेतले नाही, मग गद्दार म्हणल्यानंतर तुम्हाला का मिरच्या झोंबतात? तुम्ही गद्दार आहात का? असा सवाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उपस्थित केला आहे.