
आर्थिक संकटात लालपरी! ७ हजार कोटींच्या थकबाकीतून बाहेर काढण्यासाठी प्रताप सरनाईकांकडे साकडे
मुंबई: राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या दळणवळणाचा कणा मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे.एसटी महामंडळ आर्थिक कचाट्यात सापडले असून सात हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वैधानिक देणी रक्कम थकीत आहे. सामान्य माणसाचे दळण वळणाचे मुख्य साधन असलेल्या लोकवाहिनीला यातून बाहेर काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज (6 जून 2026) महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. लालपरीची प्रतिकृती देऊन तिला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करीत आहात. तसेच या संदर्भात व्यवस्थापनाकडून वारंवर पत्रव्यवहार केला जात असून आर्थिक मदत करण्याची लेखी मागणी सरकारकडे करण्यात येत आहे. पण मे महिन्याच्या वेतनासाठी व थकीत देयकांसाठी या महिन्यात ७७१ .१६ कोटींची मागणी करण्यात आली असताना फक्त एप्रिल महिन्याची सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम ३६३. १६ कोटी रुपये इतकी रक्कम सरकार कडून एसटीला देण्यात आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कमेतून वेतन देण्यात येत असून दर महिन्याला वेतनासाठी दर महिन्याला ४७६कोटी रुपये इतकी रक्कम लागत आहे.त्यात वेतनवाढ फरकाच्या हप्त्याची ५८ कोटी ३० लाख रुपये इतकी रक्कम समाविष्ट केली तर वेतनाला एकूण ५३४ कोटी रुपये इतकी रक्कम लागत आहे. या महिन्यात मागणी केलेली पूर्ण रक्कम सरकार कडून देण्यात आली नसल्याने पी.एफ .,ग्रॅज्युइटी, बँक या कपातीसह पूर्ण वेतन देणे शक्य होणार नाही.व त्यामुळे थकीत रक्कमेचा आकडा वाढणार आहे.त्यामुळे महामंडळाने मागणी केल्याप्रमाणे ७७१. १६ कोटी रुपये इतकी रक्कम शासनाने दिली पाहिजे असेही बरगे यांनी म्हटले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देणे, इंधन व देखभाल खर्च भागवणे आणि प्रवासी सेवांची गुणवत्ता टिकवून ठेवणे या दृष्टीने आर्थिक सहाय्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे कर्मचारी संघटनांचे मत आहे. त्यामुळे परिवहन विभागाने आणि राज्य सरकारने तातडीने ठोस आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी आता अधिक जोर धरत आहे.
एस.टी.महामंडळाला सुगीचे दिवस! कमावला ‘इतक्या’ कोटींचा नफा