
मिठी नदी स्वच्छतेला वेग! ५७ दिवसांत गाळ काढण्याचे लक्ष्य, ३१ मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश
अभिजीत बांगर यांनी मिठी नदीसह पूर्व उपनगरातील नालेसफाईच्या कामाचा पाहणीदौरा केला. यावेळी त्यांनी मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नियोजन केले पाहिजे, असे म्हटले. ज्या ठिकाणी घनदाट वस्ती आहे आणि मिठी नदीचा किनारा कमी आहे, तेथे विशेष लक्ष दिले पाहिजे. बीकेसी परिसरात एमएआरडीए कार्यालयाजवळ नदीचा किनारा रुंद आहे. या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये, याची खबरदारी घ्यावी तसेच असे झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले.
स्वच्छता मोहिमा सुरू असताना कामाच्या ठिकाणी अभियंत्यांची उपस्थिती अनिवार्य असल्याचा, आदेश बांगर यांनी जारी केला आहे. कंत्राटदाराने केलेल्या कामात पारदर्शकता राखली जाईल, याची खात्री करण्यासाठी त्यांनी सदैव दक्ष राहणे आवश्यक आहे. कामामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळून आल्यास, संबंधित कंत्राटदार आणि अधिकारी या दोघांवरही कडक कारवाई केली जाईल.
पाणी साचण्याची शक्यता असलेल्या क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले जावे, तसेच पावसाळ्याच्या काळात दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये पाणी साचणार नाही याची खात्री केली जावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. याव्यतिरिक्त, जिथे जिथे शक्य असेल तिथे, गटारांमधून वाहून जाणारा कचरा समुद्रापर्यंत पोहोचू नये यासाठी ‘ट्रॅश बूम’ यंत्रणा बसवण्यात यावी, असे निर्देश दिले.