'अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र
आजच्या सोशल मीडिया आणि डिजिटल युगात तरुणांच्या निर्णयांवर ट्रेंड्स आणि अल्गोरिदमचा मोठा प्रभाव आहे. याच पार्श्वभूमीवर मुंढे यांनी तरुणांना अल्गोरिदमच्या मागे धावण्याऐवजी त्याला लीड करण्याचा संदेश दिला. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणे किंवा कॅमेऱ्याचे लक्ष वेधून घेणे म्हणजे नेतृत्व नव्हे. व्यवस्थेतील त्रुटी ओळखून त्या दूर करण्यासाठी प्रत्यक्ष काम करणे हेच खरे नेतृत्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
समाजात एखादी गोष्ट मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाते म्हणून ती योग्य असेलच असे नाही. त्यामुळे गर्दी चुकीच्या दिशेने जात असेल तर तिच्यामागे जाण्याऐवजी योग्य मार्गावर एकट्याने उभे राहण्याचे धैर्य तरुणांनी दाखवावे, असा संदेश मुंढे यांनी दिला. Gen Z ने सामाजिक प्रश्नांकडे केवळ वरवरच्या दृष्टिकोनातून न पाहता त्यामागील कारणे, परिणाम आणि स्वतःची जबाबदारी यांचा विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.
मुंढे यांनी नेतृत्वाच्या पारंपरिक कल्पनेलाही वेगळा दृष्टिकोन दिला. सोशल मीडिया, कॅमेरे किंवा लोकांची वाहवा मिळवणे यापेक्षा लोकांच्या जीवनावर प्रत्यक्ष सकारात्मक परिणाम घडवणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. खरे नेतृत्व म्हणजे अडचणींपासून दूर राहणे नव्हे, तर समस्या ओळखून त्यावर उपाय शोधणे आणि त्यासाठी आवश्यक ते निर्णय घेणे होय, असा संदेश त्यांच्या संवादातून तरुणांना मिळाला.
सिव्हिल सर्व्हिसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मुंढे यांनी महत्त्वाचा सल्ला दिला. ‘तुम्हाला प्रशासनात का जायचे आहे?’ या प्रश्नाचे उत्तर शोधल्यानंतरच तयारी सुरू करावी, असे त्यांनी सांगितले. केवळ मोठ्या प्रमाणावर माहिती जमा करण्यापेक्षा जनतेची सेवा करण्याची प्रेरणा, विश्लेषणात्मक क्षमता, समस्या समजून घेण्याची वृत्ती आणि त्या सेवेसाठी आपली योग्यता यांचा विचार करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी स्वतःच्या ऑल इंडिया रँक २० मिळवण्याच्या अनुभवाचाही संदर्भ दिला.
सत्राच्या अखेरीस तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या सुरू असलेल्या अंमलबजावणी मोहिमांबाबतही भाष्य केले. अन्नसुरक्षेच्या बाबतीत शून्य-सहिष्णुतेची भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित विषयांमध्ये कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी नियमांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. खराब किंवा त्रुटीपूर्ण व्यवस्था बदलण्यासाठी विरोधाचा सामना करण्याची तयारी आणि धैर्य खऱ्या नेतृत्वात असले पाहिजे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
‘मल्हार २०२६’च्या सांस्कृतिक वातावरणात तुकाराम मुंढे यांचे हे सत्र विद्यार्थ्यांसाठी कला आणि मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन नेतृत्व, सामाजिक जबाबदारी आणि करिअरकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन देणारे ठरले. एकूणच, स्वतःचा विचार करा, गर्दीचे अंधानुकरण करू नका, प्रसिद्धीपेक्षा प्रत्यक्ष कामाला महत्त्व द्या आणि व्यवस्था सुधारण्यासाठी आवश्यक ते धैर्य दाखवा, हा तुकाराम मुंढे यांच्या संवादाचा मुख्य सूर राहिला.
Nagpur : दूध ,खाद्यतेल आणि मसाल्यांमध्ये मोठी भेसळ ; ३.४० कोटींहून जास्त माल जप्त !

