टोल वाचविण्याच्या नादात चालकाचा मृत्यू
नागपूर : चालकाच्या चुकीमुळे अनेक अपघात होताना दिसत आहे. त्यात नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील गोंडखैरी-मंगरुळ पांदण रस्त्यावर मंगळवारी (दि. २६) दुपारी सव्वा एकच्या सुमारास भीषण घटना घडली. टोलनाका वाचवण्यासाठी कंटेनर ट्रक पांदण रस्त्याने जात असताना 11 हजार व्होल्टच्या विद्युत तारेच्या स्पर्शाने चालकाचा जागीच मृत्यू झाला.
राजेशकुमार रामसुदर्शन यादव (वय ३१, रा. पिडारीया, पोस्ट बिझवली, ता. हनुमाना, जि. रिवा, मध्य प्रदेश) असे मृतक ट्रकचालकाचे नाव आहे. तो सिंगल ट्रान्सपोर्ट कंपनीच्या (एनएल-०१/एन-८१९३) कंटेनर ट्रकवर कार्यरत होता. चालक चौदामैल येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी राखड घेऊन आला होता. मात्र, टोलनाका वाचवण्यासाठी परतीच्या वेळी मंगरुळ-गोंडखैरी पांदण रस्त्याने जात असताना गोंडखैरी शिवारातील अग्रवाल यांच्या शेताजवळ ट्रकचा वरील भाग विद्युत तारेस स्पर्श झाला आणि ही दुर्घटना घडली. त्यात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच काही कार्यकर्ते घटनास्थळी धावले आणि विद्युत विभागाला कळवून वीजपुरवठा बंद करण्यात आला. कळमेश्वर पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
मृतकाच्या मोबाईलवरील संपर्क क्रमांकावरून ट्रान्सपोर्ट मालकाला कळविण्यात आले. त्यानंतर तो घटनास्थळी दाखल झाला आणि मृतकाची ओळख पटली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मन्नान नौरंगाबादे व पोलिस शिपाई राणा सिंह करीत आहेत.
राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस
दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. या पावसामुळे अनेक दुर्घटना होत असल्याचे समोर येत आहे. असे असताना आता बुलडाण्यात मायलेकीला विजेचा जोरदार धक्का बसला. घराच्या अगदी चार फूट अंतरावरून गेलेल्या अतिउच्च दाबाच्या विजतारांचा स्पर्श झाल्याने मायलेकी गंभीर जखमी झाल्या.