
फोटो सौजन्य सोशल मीडिया
जुन्या वैमनस्यातून राजवीर शर्मा (१८, रा. कुशीनगर) याची निघृण हत्या केली तर मध्यस्थीसाठी धावलेला मित्र नयन सोनबरसे याच्यावरही वार केले. नयनवर उपचार सुरू आहे. याप्रकरणी जरिपटका पोलिसांनी राज इलमकर (२२), रोहित इलमकर (२०) आणि हनी डोंगरे (२५, तिघेही रा. कुशीनगर) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर तिन्ही आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजवीर बहिणीच्या घरून घरी परतत असताना आरोपींनी रस्त्यात अडवून शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर गालावर झापडही मारली. त्यानंतर राजवीर घरी परतला. तो रागात असल्याचे पाहून आईने विचारपूस केली. राजवीरने घरातून दांडा घेतला.
त्याचा राग पाहून आईने घराबाहेर जाऊ नये म्हणून दार बंद केले. मात्र, काही वेळाने राजवीर कसातरी घराबाहेर पडला. राजवीर दिसताच आरोपींनी पुन्हा वाद घातला. आरोपींनी धारदार शस्त्र काढून राजवीरवर जीवघेणे वार करण्यास सुरुवात केली. मुलावर हल्ला होत असल्याचे पाहून आई घटनास्थळी धावली आणि ‘माझ्या लेकराला वाचवा’ अशी आर्त हाक देत मदतीसाठी आरडाओरड करू लागली.
Nagpur News : ‘नागपूर तो झांकी है, आझाद मैदान बाकी है’ ; कंत्राटदार उतरले रस्त्यावर
राजवीरला रक्तबंबाळ केल्यानंतरही त्यांनी हल्ला थांचवला नाही. आई आरडाओरड करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर इलमकर बंधूनी ‘ही राजवीरची आई आहे. पोलिस ठाण्यात तक्रार दिली तर तिचाही खून करू’ अशी धमकी दिल्याचे समोर आले आहे. राजवीरचा मित्र नयन सोनबरसे मध्यस्थी करण्यासाठी आला असता आरोपीनी त्याच्यावरही वार केले. रक्ताच्या थारोळ्यात घडलेल्या दोघांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी राजवीरला मृत घोषित केले, नयनवर उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.
Nagpur News : एनएमआरडीएची ताकद वाढली ;१६० पदांच्या पुनर्रचना प्रस्तावाला मंजुरी
राजवीर नुकताच ७ ऑगस्टला १८ वर्षांचा झाला होता. वाढदिवसाचा आनंद साजरा केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्याच्यावर काळाने झडप घातली. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याची मोठी बहीण विवाहित आहे. आई रुग्णालयात स्वागतकक्षात काम करते तर वडील ट्रकचालक आहे.
राजवीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना आईनेच त्याला हात देत रुग्णालयात पाठवले, प्राथमिक -तपासात जुन्या किरकोळ वादातून हल्ला झाल्याचे समोर आले आहे. मात्र, आरोपीच्या अटकेनंतर हत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.