बीड व परभणी प्रकरणावरुन नाना पटोले आक्रमक; म्हणाले, आता सरकारला...
नागपूर : ईव्हीएममधून निवडून आलेले भाजपा युती सरकार लोकशाही व्यवस्थेचा खून करण्याचे काम करत आहे. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपेरशन करुन दलित बांधवांवर अत्याचार केले. सोमनाथ सुर्यवंशी या दलित युवकाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली. या दोन्ही प्रकरणी सरकारच्या भूमिकेवर तोफ डागत भाजपा युती सरकारला लोकांच्या भावनांशी काही देणेघेणे नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएम, बीड व परभणी प्रकरणी सरकारविरोधात विधान भवनाच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन्यांना अटक करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. खुन्यांना संरक्षण देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
सभागृहाचे कामकाज सुरु होताच नाना पटोले यांनी परभणीतील पोलीस अत्याचाराचा व दलित तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी नाना पटोले म्हणाले की, आंबेडकरी विचाराचा तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी परभणीत जे कोंबिग ऑपरेशन केले ते शासन निर्मित होते का, यासह या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली पाहिजे त्यासाठी स्थगन प्रस्ताव दिला आहे. या विषयावर बुधवारी चर्चा करु, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा : कैद्यांमध्ये पुन्हा हाणामारी; येरवडा कारागृहात नेमकं काय घडलं?
पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या ईव्हीएम विधानसभेला वापरल्या नाहीत, त्यासाठी गुजरातमधून ईव्हीएम मागवण्यात आल्या. ईव्हीएमचा दुरुपयोग केला जात आहे. ईव्हीएम मशीन बनवण्याच्या कंपनीत भाजपाचे लोक संचालक मंडळावर आहेत. निवडणूक आयोगाला असलेले संवैधानिक अधिकाराचा वापरही ते करू शकत नाहीत सर्व कारभार भाजपाच्या इशाऱ्यावर सुरु आहे यातून भाजपाची मानसिकता स्पष्ट होते. लोकशाही व्यवस्था संपवण्याची आरएसएसची जी मानसिकता आहे त्यासाठीच वन नेशन नो इलेक्शन विधेयक आणले जात आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी संपन्न
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमधील राजभवन येथे संपन्न झाला असून महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपूर येथील राजभवनवर राज्यपाल राधाकृष्णन यांनी सर्वच मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यामध्ये, 33 कॅबिनेटमंत्री तर 6 राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात 4 लाडक्या बहिणींना संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडेंसह आदिती तटकरे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. तर, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ हे दोन नवे चेहरे मंत्रिमंडळात आले आहेत.