
Artists expressed their disappointment due to the lack of audience in Nanded Art Festival.
नवराष्ट्र : संतोष कुलकर्णी : नांदेड : लाखो रुपयांची उधळपट्टी करून राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला वैशिष्ट्यपूर्ण कला महोत्सव प्रेक्षकांच्या अभावी अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यात अपयशी ठरल्याचे विदारक चित्र नांदेडमध्ये (Nanded News) दिसून आले. तीन फेब्रुवारी रोजी कुसुम सभागृहात या महोत्सवाचा शुभारंभ झाला. मात्र पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा उपयोग नेमका कुणासाठी आणि कशासाठी करण्यात आला, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करण्यात आली असतानाही कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसिद्धीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे प्रकर्षाने जाणवले.
परिणामी, सातशे ते आठशे प्रेक्षक बसू शकतील इतक्या प्रशस्त सभागृहात केवळ मोजकेच प्रेक्षक उपस्थित होते. या लोककलेच्या उत्सवाला मिळालेला हा अल्प प्रतिसाद प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे द्योतक ठरत आहे. या वैशिष्ट्यपूर्ण कला महोत्सवात वासुदेव, जागरण गोंधळ, पोतराज, करपल्लवी, लोकवाद्य, कीर्तन तसेच विविध आदिवासी लोककलांचे सादरीकरण ठेवण्यात आले होते. किनवट तालुक्यातील चिखली तांडा, खांबाळा येथून सुमारे दोनशे किलोमीटरचा प्रवास करून बंजारा समाजातील पुरुष व महिला कलाकार आपली लोकसंस्कृती सादर करण्यासाठी नांदेडमध्ये आले होते. मात्र त्यांना दिलेला वेळ अत्यंत अपुरा ठरला. महिला कलाकारांना अवघ्या वीस मिनिटांचा तर पुरुष कलाकारांना केवळ पाच मिनिटांचा कालावधी प्रबोधनात्मक सादरीकरणासाठी देण्यात आला. एवढ्या कमी वेळेत बंजारा लोकसंस्कृतीची ओळख करून देणे अशक्य असल्याची भावना कलाकारांनी व्यक्त केली. कोणत्याही लोककलेची सुरुवात मंगलाचरणाने व प्राथमिक सादरीकरणाने होते.
हे देखील वाचा : रायगडच्या राजकारणात भूकंप! मनसे महाविकास आघाडीतून पडली बाहेर
बंजारा लोकसंस्कृती ही नृत्य किवा गायनापुरती मर्यादित नसून ती त्याच्या जगण्याशी, चालीरीतीशी आणि जीवनमूल्यांशी जोडलेली आहे. ही संस्कृती शहरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी या महोत्सवातून मिळेल, अशी कलाकारांची अपेक्षा होती. मात्र प्रेक्षकांच्या अभावामुळे ती अपेक्षा फोल ठरली. या महोत्सवात सुमारे दहा संच सहभागी झाले होते. परंतु दहा-बारा प्रेक्षकांसमोर सादरीकरण करताना कलाकारांची ऊर्जा, उत्साह आणि आत्मविश्वास कमी झाल्याचे जाणवत होते. काही महिला कलाकारांनी किमान अर्धा तास तरी सादरीकरणासाठी मिळायला हवा होता, अशी मागणी केली. तसेच लोककलावंतांना सन्मानाने वागणूक देणे गरजेचे असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. एकूणच या घटनेमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन, प्रचार-प्रसार आणि लोककलावंतांच्या सन्मानाबाबत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भविष्यात अशा महोत्सवांचे आयोजन करताना अधिक अभ्यासपूर्ण, नियोजनबद्ध आणि संवेदनशील दृष्टिकोन स्वीकारण्याची नितांत गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे देखील वाचा : ”मी कामाचा माणूस आहे… राजकारणातून मतदारांना भावनिक आवाहन, पुणे जिल्ह्यात प्रचाराची दिशा बदलली