
स्मार्ट मीटर हटवून जुने मीटर बसविण्याचा निर्णय तातडीने घ्या, अन्यथा...; मनसेचा इशारा
नांदेड : नांदेडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्मार्ट मीटरवरुन मनसे पक्ष आक्रमक झाला आहे. राज्यभर बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट वीज मीटरमुळे ग्राहकांना अवाजवी वीजबिले येत असल्याचा आरोप करत हे मीटर तात्काळ हटवून पूर्वीचे मीटर बसवावेत, अन्यथा महावितरणच्या कार्यालयावर ग्राहकांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या नांदेड विभागाचे मुख्य अभियंता यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी अनेक मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शहराध्यक्ष अब्दुल सफिक यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात, ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम राबविली जात असून त्यानंतर अनेक ग्राहकांना दीडपट ते दुप्पट वीजबिले येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच बिल भरण्यास विलंब झाल्यास पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्याचे नमूद करण्यात आले. निवेदनात महावितरणकडून वीज कायद्यातील विविध तरतुदींचे पालन होत नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास नुकसानभरपाई, ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीतील विलंब, शेतजमिनीतील वीज खांब व ट्रान्सफॉर्मरचे भाडे तसेच कृषीपंपांना अंदाजे वीजबिल आकारणी आदी मुद्द्यांवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. स्मार्ट मीटर हटवून जुने मीटर बसविण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन व महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : आनंदाची बातमी! पुणे जिल्ह्यातील 38 हजार 970 शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 345 कोटी…
महावितरणकडून सक्तीची नोटीस
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार, सदाशिव पाटील बोंढारकर, अनिकेतसिंह परदेशी, महेश ठाकूर, हेमंत पांचाळ, शंकर सरोदे, दिलीप राठोड, कृष्णा पेल्लेवाड, कृष्णा राठोड, अनुप पालदेवार यांच्यासह पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. एकीकडे मनसेने आंदोलनाचा इशारा केलेला असताना महावितरणने स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करणारी नोटीस ग्राहकांना जारी केली आहे.