संग्रहित फोटो
पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवरील ३४५ कोटी २५ लाख ५ हजार ५९४ रुपयांची थकबाकी कर्जमुक्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ७) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातून आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने संबंधित बँकांच्या कर्जखात्यात वर्ग करण्यात आली.
या कर्जमुक्तीमुळे पुणे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी झाला असून, आगामी खरीप हंगामासाठी नव्याने पीक कर्ज घेण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत.
राज्यात या योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या सुमारे ६ लाख २२ हजार पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर ५ हजार २८ कोटी रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे आणि सहकार आयुक्त दीपक तावरे उपस्थित होते. सर्व पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच सहकारी संस्थांचे निबंधक दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
आधार प्रमाणीकरण अपूर्ण असल्यास प्रक्रिया पूर्ण करा
पुणे जिल्ह्यातील पहिल्या यादीत पात्र ठरलेल्या ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्रतेनुसार त्यांच्या कर्जखात्यावरही कर्जमुक्तीची रक्कम थेट वर्ग करण्यात येणार आहे.






