नाशिकमध्ये ठाकरे गटाचा एल्गार! ‘मनपावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; संजय राऊतांचा प्रशासनावर हल्लाबोल
ठाकरे गटाने या मोर्चाला आक्रमक स्वरूप देताना प्रतीकात्मक यमराज आणि रेडा देखील मोर्चात आणला. खराब रस्त्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असूनही महापालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. यावेळी संजय राऊत यांनी महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली. ‘यमाने आता मनपात जाऊन माजालेल्यांवर रेडा सोडायचा,’ असा टोला त्यांनी प्रशासनाला लगावला.
मोर्चादरम्यान बोलताना संजय राऊत यांनी महापालिका प्रशासनाला लक्ष्य केले. ‘महापौर, आयुक्तांकडे संवेदनशीलता असेल तर निवेदन स्वीकारा,’ असे आवाहन त्यांनी केले. नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. नाशिक शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना होणारा त्रास तसेच अपघातांचा धोका याबाबत ठाकरे गटाकडून महापालिकेकडे जाब विचारण्यात आला.
मोर्चानंतर ठाकरे गटाकडून महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, खड्डे बुजवावेत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
ठाकरे गटाचे नेते सुनील राऊत यांनीही महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले. रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचा आरोप करत महापालिका प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न आगामी काळात आणखी तापण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे गटाने महापालिका प्रशासनाला थेट लक्ष्य केले आहे. त्यामुळे या मोर्चानंतर महापालिका प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.