
पूर ओसरताच गोदापात्र बनले ‘खुले सर्व्हिस स्टेशन’; वाहनधारकांकडून सर्रास वाहन धुलाई
गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला होता. कालपासून पुराचे पाणी ओसरल्याने गोदा घाट परिसर मोकळा झाला आहे. मात्र, या ओसरलेल्या पाण्याचा गैरफायदा घेत अनेक वाहनधारक थेट गोदापात्रातच वाहने उतरवून ती धुताना दिसत आहेत.
वाहनांच्या धुराची काजळी, इंजिनचे तेल, ग्रीस आणि रासायनिक साबण-डिटर्जेंट थेट गोदावरीच्या पवित्र जलात मिसळत आहे. त्यामुळे पाण्यावर तेलाचे थर साचले असून नदीच्या जैविक विविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे.
गोदावरी संवर्धनासाठी नाशिक महानगरपालिकेत स्वतंत्र ‘गोदावरी संवर्धन कक्ष’ कार्यरत असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्या कक्षाने नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आजवर कोणती ठोस आणि दृश्यमान कामगिरी केली, याचा लेखाजोखा नागरिकांसमोर मांडला जावा. कारण प्रत्यक्षात रामकुंडासारख्या देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी उघडपणे वाहने धुतली जात आहेत आणि संबंधित यंत्रणा कारवाई करताना दिसत नाही, गोदावरी संवर्धनासाठी खर्च होणारा निधी आणि प्रशासनाचे दावे केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होणे स्वाभाविक आहे,अशी प्रतिक्रिया गोदाप्रेमी देवांग जानी यांनी दिली.
रामकुंड है हिंदू धर्मियांचे अत्यंत पवित्र श्रद्धास्थान असून जगभरातून हजारो भाविक येथे अस्थी विसर्जन, श्राद्ध, पिंडदान आणि अन्य धार्मिक विधीसाठी येतात. गोदावरी नदी येथे दक्षिणवाहिनी होत असल्याने या क्षेत्राला ‘दक्षिणकाशी म्हणूनही ओळखले जाते. अशा पवित्र तीर्थक्षेत्रात वाहने धुण्याचे प्रकार अत्यंत निषेधार्ह असून त्यामुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावतात आणि तीर्थक्षेत्राच्या पावित्र्यालाही धक्का पोहोचतो, शासन व प्रशासनाने अशा प्रकारांवर तातडीने कठोर कारवाई करून संबंधितांवर मोठा दंड आकारावा, तसेच भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे, अशी माहिती पुरोहित संघ अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी दिली.
Nashik Scandal: तांत्रिक खरातने दिला नरबळी: सुनावणीदरम्यान सरकारी वकिलाचा खळबळजनक संशय