नेरुळमध्ये साचलेल्या पाण्यात करंट; दोन विद्यार्थिनी जखमी, महावितरणचा प्राथमिक अहवाल समोर
सावन वैश्य | नवी मुंबई : नेरुळ एल.पी. नाका येथील बिकानेर स्वीट्ससमोरील सर्कलजवळ पावसामुळे साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने दोन विद्यार्थिनी जखमी झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे दोघींना तातडीने डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नेरुळ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे एल.पी. नाका परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्याचवेळी पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने तेथून पायी जात असलेल्या कु. उज्वला लक्ष्मण वाघ आणि कु. शुभांगी सुभाष वालखंडे या दोन विद्यार्थिनींना जोरदार विद्युत धक्का बसला. दोघीही खाली कोसळल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करून त्यांना रिक्षाच्या सहाय्याने डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थिनींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
दरम्यान, या घटनेबाबत महावितरणच्या भांडुप परिमंडलाच्या जनसंपर्क विभागाने स्पष्टीकरण प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, नेरुळ एल.पी. नाका पुलाखालील नवी मुंबई महानगरपालिकेच्या पथदिवा वीजजोडणीवरून परिसरातील पथदिव्यांना वीजपुरवठा केला जातो. घटनेनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी केली असता, संबंधित वीजजोडणीच्या मीटरमधून जाणाऱ्या आउटगोइंग केबलपैकी एका केबलचे इन्सुलेशन तुटलेले असल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले. पावसाच्या पाण्याशी या केबलचा संपर्क आल्यामुळे परिसर विद्युतभारित झाला असावा, अशी शक्यता महावितरणने व्यक्त केली आहे. या घटनेनंतर सहाय्यक विद्युत निरीक्षक सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच महावितरणने तात्काळ संबंधित वीजपुरवठा बंद करून परिसर सुरक्षित केला.
महावितरणने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, संबंधित पथदिवा वीजजोडणी आणि त्यावरील आउटगोइंग केबल ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची असून तिची देखभालही महापालिकेमार्फत केली जाते. त्यामुळे या प्रकरणातील पुढील तांत्रिक तपासणी व आवश्यक कार्यवाही नवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्युत विभागाकडून करण्यात येणार आहे.
या घटनेनंतर पावसाळ्यापूर्वी पथदिव्यांच्या वीजजोडण्या, केबल्स आणि जलनिस्सारण व्यवस्थेची नियमित तपासणी करण्याची आवश्यकता पुन्हा अधोरेखित झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महानगरपालिका, महावितरण आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Mumbai Rain: अखेर मुंबईकरांना दिलासा! ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुंईबत पावसाचे आगमन






