सिंधुदुर्ग /भगवान लोके : देशाची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच मुंबई पर्यटनासाठी देखील तितकीच महत्त्वाची आहे. मुंबईच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि मुंबईकरांच्या सेवेसाठी ई-वॉटर टॅक्सी लवकरच सुरु होणर आहे. मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार असून देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे.
या नव्या सुविधेसाठी पाश्चात कंपनीची मदत घेण्यात आली आहे. स्विडनच्या कँडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबविणार आहे. ही सेवा त्वरीत सुरू करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्विडनचे महावाणिज्य दूत स्वेन ओस्टबर्ग यांना बैठकी दरम्यान केल्या आहेत. मंत्रालयात आज मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याशी महावाणिज्य दूत ओस्टबर्ग यांनी ई-वॉटर टॅक्सीबाबत चर्चा केली. यावेळी ओस्टबर्ग यांच्या सल्लागार सलोनी झव्हेरी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुंबई महानगरामध्ये प्रचंड वाहतूक यंत्रणेवर ताण येत असून ई-वॉटर टॅक्सी लवकर सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग या जलवाहतूक मार्गाच्या पायलट प्रोजेक्टने मुंबईला भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. स्विडनच्या कँडेला कंपनीशी झालेल्या करारानुसार त्यांनी नागरिकांची सुरक्षितता, वातावरण, पर्यावरण यांचा विचार करावा. शिवाय वॉटर टॅक्सीचे नागरिकांना परवडणारे माफक दर ठेवावेत. कंपनीला लागणाऱ्या परवान्याबाबत राज्य शासन दक्षता घेईल, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
यावेळी ओस्टबर्ग म्हणाले , महाराष्ट्रातील पोर्टच्या विकासात स्वारस्य आहे. स्वीडनची कॅंडेला कंपनी येवून सर्व माहितीचे सादरीकरण करेल. त्यानंतर वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट त्वरीत सुरू केला जाईल. पोर्टचा विकास, स्वच्छता, सोयी-सुविधा,गुंतवणुकी बाबतची माहिती दिली.
महावाणिज्यदूत ओस्टबर्ग यांनी पोर्टच्या विकासात स्वीडन कंपनी योगदान देवू इच्छित असल्याने सांगितल्याने मंत्री नितेश राणे यांनी ससून डॉकची पाहणी करण्याची सूचना केली आहे. स्विडन कंपनीने राज्य शासनाला पोर्टच्या विकासाबाबत प्रस्ताव सादर करावा असं ही सांगण्यात आलं आहे. वाहतुकीसाठी सुलभ ठिकाणांची पाहणी करून देशात एक नंबर होईल, असे मॉडेल पोर्ट विकसित करावे. यासाठी मेरीटाईम बोर्डाशी चर्चा करून एप्रिलमध्ये पाहणी करून अहवाल सादर करावा, असेही मंत्री राणे यांनी सांगितले आहे.