
दीड-दोन तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत! सिंधुदुर्गात सुरू होणार आधुनिक फेरीबोट सेवा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलवाहतुकीसंदर्भात मंत्रालयातील समिती कक्षात नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी नवीन फेरीबोटची बांधणी, कार्यान्वयन आणि देखभाल यासंदर्भातील प्रस्तावाचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले.
Smart Meter Protest: ‘स्मार्ट मीटर हटवा, अन्यथा उखडून फेकू’; शेकापचे जयंत पाटील यांचा सरकारला इशारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात फेरीबोट सेवेसाठी सध्या पाच संभाव्य मार्गांचा विचार करण्यात येत आहे. त्यामध्ये कर्ली जेट्टी-तारकर्ली जेट्टी, काळी जेट्टी-देवबाग जेट्टी, देवबाग जेट्टी-निवती जेट्टी, विजयदुर्ग अनुसरे-दांडे आणि आरोंदा-किरणपाणी या मार्गांचा समावेश आहे. मात्र, या मार्गांवर प्रत्यक्ष सेवा सुरू करण्यापूर्वी सविस्तर सर्वेक्षण करण्याचे निर्देश राणे यांनी दिले आहेत. जेट्टीची उपलब्धता, समुद्रातील भरती-ओहोटी, पाण्याची आवश्यक खोली तसेच संबंधित मार्गांवरील प्रवासी आणि वाहनांची संभाव्य मागणी यांचा अभ्यास करून अंतिम मार्ग निश्चित केला जाणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात कर्ली ते तारकर्ली मार्गापासून करण्याचा प्रस्ताव आहे. या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर फेरीबोट सेवा सुरू करण्याचा विचार करण्यात येत आहे. सध्या कर्ली ते तारकर्ली हा प्रवास रस्त्याने करण्यासाठी सुमारे दीड ते दोन तास लागतात. प्रस्तावित जलवाहतूक सेवा सुरू झाल्यास हाच प्रवास अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे राणे यांनी सांगितले. यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचू शकतो. विशेषतः तारकर्ली-देवबागसारख्या लोकप्रिय पर्यटनस्थळांना जोडणारी जलवाहतूक व्यवस्था विकसित झाल्यास किनारपट्टीवरील पर्यटन व्यवसायालाही फायदा होण्याची अपेक्षा आहे.
प्रस्तावित फेरीबोटची संकल्पना सुमारे 20 मीटर लांब आणि 7.5 मीटर रुंद अशा एकेरी डेकच्या बोटीची आहे. संकल्पनात्मक आराखड्यानुसार या फेरीबोटमधून प्रवाशांसोबत चारचाकी आणि दुचाकी वाहनेही वाहून नेण्याची क्षमता प्रस्तावित आहे. त्यामुळे ही सेवा केवळ प्रवासी वाहतुकीपुरती मर्यादित न राहता वाहनांसह जलमार्गाने प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध करून देऊ शकते.
फेरीबोट प्रकल्पाचा सिंधुदुर्गच्या स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होण्याची अपेक्षा आहे. नवीन बोटींची बांधणी, त्यांचे कार्यान्वयन आणि नियमित देखभाल यामुळे स्थानिक जहाजबांधणी आणि सागरी अभियांत्रिकी क्षेत्राला काम मिळू शकते. खासगी क्षेत्राच्या सहभागातून जलवाहतूक अधिक नियमित आणि आधुनिक करण्याचाही प्रस्ताव आहे. फेरीबोट सेवा प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर पर्यटनाशी संबंधित व्यवसाय, वाहतूक, तांत्रिक सेवा आणि इतर पूरक क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. एकूणच, अंतिम सर्वेक्षण आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा प्रस्ताव प्रत्यक्षात उतरल्यास सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील प्रवासाचा वेळ कमी करण्याबरोबरच जिल्ह्याच्या पर्यटन आणि सागरी अर्थव्यवस्थेला नवी गती मिळू शकते.
Shivsena News : विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द; सहा वर्षांची निवडणूक बंदी, ठाकरे गटाला मोठा धक्का