मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील सतीश उके (Satish Uke) आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे काही अपराध असतील. त्यांनी जमिनीचे व्यवहार चुकीच्या पद्धतीने केले असतील, त्यांनी जमीन लुटली असेल, त्यांनी जमीन बळकावली असेल, त्यांनी कुणाला धमकी दिली असेल तर महाराष्ट्राचे पोलीस तपास करतील. ईडीने खास येऊन तपास करावा आणि धाडी घालाव्यात असा हा गुन्हा नाहीये. कोणत्याही राज्याचे पोलीस अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करतात. हा राज्यांतील पोलिसांचा सरळ सरळ अतिक्रमण आहे. मी म्हणतो ना उकेनी गुन्हा केला असेल तर भादंविनुसार त्यांच्यावर कारवाई व्हावी, असं संजय राऊत म्हणाले. (Sanjay Rautm On ED Inquiry Of Satish Uke)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ईडीच्या या कारवाईवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ज्या प्रकारे काश्मीरमध्ये अचानक अतिरेकी घुसतात. बॉम्ब हल्ले करतात आणि निघून जातात. त्याच प्रकारे या केंद्राच्या अतिरेकी कारवाया आहेत. तपास यंत्रणांना राज्यात घुसवलं जातं आणि ते अटक करून निघून जातात. जर यातून संघर्ष निर्माण झाला तर केंद्र आणि राज्य हा संघर्ष फार मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. म्हणून ममता बॅनर्जी यांनी गैरभाजप शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्रं पाठवलं आहे. त्यांचं पत्रं हे याच भूमिकेतून लिहिलं आहे. सर्वांनी एकत्र येण्याची त्यांची भूमिका त्याच गोष्टीसाठी आहे, असं सांगतानाच केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिमा धुळीस मिळाली आहे. आता रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपास सीबीआय आणि ईडीकडून करण्याचीच तेवढी गरज आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.