केंद्रांची संख्या वाढवावी,
पुणे : ‘जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एसएसआरपी) मुदतीत लावण्यासाठी तातडीने केंद्रांची संख्या वाढवावी,’ असे आदेश उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) रोजमेर्टा कंपनीला दिले आहेत. नोंदणी केलेल्या वाहनचालकांना मे, जून महिन्यापर्यंतच्या आरक्षित वेळ आरक्षित करून दिल्या आहेत. त्यामुळे मुदतीनुसार 30 एप्रिलनंतर कारवाई करायची किंवा नाही, असा पेच निर्माण झाल्याने ‘आरटीओ’ प्रशासनाने कंपनीला सूचना केल्या आहेत.
तसेच केंद्रांची नियुक्ती करताना कुशल कर्मचारी असतील, अशाच केंदांची नियुक्ती करावी, जेणेकरून दिवसभरात एका केंद्रावर 25-30 वाहनांना पाटी बसविले जाईल, असेही यावेळी बजावण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या निर्देशानुसार, जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी लावण्यासाठी 30 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर वाहनचलाकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. आत्तापर्यंत सव्वा लाखांपेक्षा जास्त वाहनधारकांनी ऑनालाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी 40 हजारांहून अधिक वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी लावली आहे.
तसेच 65-70 हजार वाहनधारक प्रतीक्षेत आहेत, तर त्यांच्यासाठी कंपनीकडून 125 केंद्रांवर पाटी बसवून देण्यात येत आहे. मात्र, यातील काही केंद्रांवर कुशल कामगारांचा अभाव असल्याने एका वाहनाला पाटी लावण्यासाठी एक तासापेक्षा जास्त कालावधी लागत आहे, अनेकांना मे महिन्यानंतरची वेळ आरक्षित करून देण्यात आली आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनचालकांचा मनस्ताप होत तक्रारी प्राप्त झाल्याने ‘आरटीओ’ प्रशासनाने तातडीने केंद्र वाढविण्याबाबत सूचना केल्या आहेत.
आठवडाभरात केंद्रांची संख्या 500 पर्यंत जाईल
जुन्या वाहनधारकांना उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी लावण्यासाठी सुलभ आणि मुदतीत सेवा मिळवून देण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांना केंद्र वाढविण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. येत्या आठवडाभरात केंद्रांची संख्या ५०० पर्यंत जाईल, अशी अपेक्षा आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितले.