
MSEDCL Otur: महावितरण कंपनीच्या गलथान आणि मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य ग्राहक प्रचंड हवालदिल झाले आहेत. चुकीचे मीटर रीडिंग, वेळेवर न मिळणारी बिले आणि वीज तोडण्याची धमकी देऊन केली जाणारी सक्तीची वसुली यामुळे ओतूर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर, जुन्नर तालुका मानवाधिकार सुरक्षा संघाचे अध्यक्ष हेंमत पाटील डुंबरे यांनी प्रशासनाला धारेवर धरले असून, महिनाभरात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Iran Israel War: इराणच्या युद्धात दुबईचा विनाश? एअरपोर्ट अनिश्चित काळासाठी बंद; एक मिसाईल आले अन्…
अनेक ग्राहकांच्या तक्रारीनुसार, वीज मंडळाचे कर्मचारी किंवा ठेकेदार प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेण्यासाठी येत नाहीत. अधिकारी कार्यालयात बसूनच अंदाजे रीडिंग टाकत असल्याने ग्राहकांना हजारो रुपयांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. ऑनलाईन मिळालेली बिले आणि प्रत्यक्ष मीटरमधील रीडिंग यामध्ये मोठी तफावत असल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत.
या समस्या घेऊन कार्यालयात जाणाऱ्या ग्राहकांना अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. बाळासाहेब एरंडे, सागर दांगट, अभिजित घोलप यांसह अनेक ग्राहकांनी संताप व्यक्त केला की, “तुम्हीच मीटरचा फोटो काढून आणा आणि बिल ऑनलाईन काढा,” अशा सूचना देऊन त्यांना परत धाडले जात आहे. ज्या ग्रामीण भागातील ग्राहकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत, त्यांची यामुळे मोठी कोंडी होत आहे. आपले काम ग्राहकांवर ढकलण्याच्या या प्रकारामुळे महावितरणच्या निष्क्रियतेचा कळस गाठला गेल्याची टीका होत आहे.
प्रशासनाने ग्राहकांची लूट थांबवून कारभारात तत्काळ पारदर्शकता आणावी, अशी मागणी हेमंत पाटील डुंबरे यांनी केली आहे. महिनाभराच्या मुदतीत सुधारणा न झाल्यास ओतूर येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
The AI War: बापरे! खामेनींचा पत्ता एआयने शोधला? अमेरिकन सैन्याच्या ‘Claude AI’ने ‘असा’ मोडला इराणचा
मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणने मीटर रीडिंग आणि बिलिंगसाठी खासगी ठेकेदारांची नियुक्ती केली आहे, मात्र हे ठेकेदार वेळेत कामे पूर्ण करत नाहीत. दुसरीकडे, वीज मंडळाचे अधिकारी थकीत बिलांच्या नावाखाली थेट वीज जोडणी तोडण्यासाठी ग्राहकांच्या दारात पोहोचत आहेत. यावेळी ग्राहकांशी अरेरावी करणे आणि दंड भरण्यासाठी दबाव आणण्याचे प्रकार वाढले आहेत.
या पार्श्वभूमीवर, मानवाधिकार सुरक्षा संघाचे अध्यक्ष हेमंत पाटील डुंबरे यांनी वीज मंडळाच्या कारभाराचा तीव्र निषेध केला आहे. “एकडे डिजिटल इंडियाच्या गप्पा मारल्या जातात, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील ग्राहकांना साध्या वीज बिलासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. प्रशासनाने आपली यंत्रणा सुधारून ग्राहकांना सन्मानाची वागणूक द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
येत्या एका महिन्यात मीटर रीडिंगमधील गोंधळ थांबवून बिले वेळेवर घरपोच न मिळाल्यास, ओतूर वीज मंडळाच्या विरोधात व्यापक जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघाने दिला आहे. याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.