
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; टॅक्सी, रिक्षा, बस चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी विचारांची आणि समृद्ध मराठी संस्कृतीची भूमी आहे. रोजगाराच्या शोधात देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे महाराष्ट्राने नेहमीच खुले मनाने स्वागत केले आहे. मात्र, राज्यातील जनतेशी संवाद साधण्या इतपत व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी देखील आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता डोमिसाईल नसेल तर लायसन्स नाहीच, 1 ऑगस्टपासून…
हा निर्णय कोणत्याही भाषे विरोधात नसून कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सुलभ संवादासाठी आणि ग्राहकाभिमुख सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. चालक आणि प्रवासी यांच्यातील स्पष्ट संवादामुळे गैरसमज कमी होतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थे वरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी परिवहन विभागाने मागील काही महिन्यांपासून राज्यव्यापी प्रशिक्षण मोहीम राबविली आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग यांच्या सहकार्याने हजारो अनुभवी शिक्षकांची फळी तयार करण्यात आली. राज्यभरातील विविध प्रादेशिक परिवहन कार्यालये, प्रशिक्षण केंद्रे तसेच चालकांच्या सोयीच्या वेळेनुसार व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या प्रशिक्षणासाठी दैनंदिन सेवेत उपयुक्त ठरणारी वाक्यरचना, प्रवाशांशी नम्र संवाद, दिशा, ठिकाणे, भाडे, आपत्कालीन प्रसंग तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांशी प्रभावी संवाद साधण्यासाठी विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. सोप्या पुस्तिका, संवाद माला आणि प्रशिक्षण साहित्याच्या माध्यमातून मराठी शिकणे सहज, सोपे आणि आनंददायी व्हावे, यावर विशेष भर देण्यात आला आहे.
“महाराष्ट्रात रोजगार करणाऱ्या प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगावा; मात्र महाराष्ट्राच्या मातृभाषेलाही मनापासून स्वीकारावे. मराठीचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि जनतेच्या भावनांचा सन्मान होय,” असा संदेश या निर्णयाच्या अंमलबजावणीतून दिला जात असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले. या ऐतिहासिक निर्णयामुळे भाषिक स्वाभिमान, प्रवासी सुरक्षा आणि दर्जेदार सार्वजनिक सेवा यांचा सुंदर संगम घडेल, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, शासनाकडून आवश्यक प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सर्वतोपरी सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल. सर्व व्यावसायिक चालक, वाहन मालक, परिवहन संघटना आणि नागरिकांनी या उपक्रमात सकारात्मक सहभाग नोंदवून महाराष्ट्र अधिक सुसंवादी, सुरक्षित आणि मराठीमय करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या प्रसंगी ज्येष्ठ कवी सुरेश भट यांच्या अमर ओळींनी सभागृह भारावून गेले—
लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी…
जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी…
धर्म, पंथ, जात एक, जाणतो मराठी…
एवढ्या जगात माय, मानतो मराठी…
या कवितेतील भावने प्रमाणेच, व्यवहारिक मराठीचा हा निर्णय केवळ एका नियमाची अंमलबजावणी नसून महाराष्ट्राच्या अस्मितेला, आपुलकीला आणि सर्वसमावेशक संस्कृतीला अधिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा ठरेल, अशी भावना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.