चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींचे कृती आराखड्याचे निर्देश
जिल्हाधिकारी कार्यालयात चाकण परिसरातील रस्ते व वाहतूक व्यवस्थेबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक झाली. यावेळी आमदार बाबाजी काळे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वाहतूक पोलीस, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.
‘शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण देताना काय निकष होते?’ सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल
चाकण, तळेगाव, बोराटे वस्ती आणि भोसरी परिसरातील जोडरस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत करावेत. सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रलंबित कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांचीही पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशा सूचना डुडी यांनी दिल्या.
वाहतूक नियंत्रणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. प्रमुख चौकांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर थेट दंडात्मक कारवाईसाठी करावा. आवश्यकतेनुसार वाहतूक पोलिसांना स्थिर तसेच फिरते निरीक्षण कॅमेरे उपलब्ध करून द्यावेत, असेही डुडी यांनी सांगितले.
चाकण चौकासह परिसरातील प्रमुख चौकांचे स्वतंत्र सर्वेक्षण करून वाहतुकीचा प्रवाह आणि पादचारी सुरक्षेचा विचार करावा. त्यानुसार उन्नत पादचारी मार्ग, भुयारी मार्ग, वाहतूक बेटे आणि सुरक्षित वळणमार्ग यांचा तांत्रिक अभ्यास करून सुधारित आराखडा तयार करावा, असे निर्देश देण्यात आले.
रस्त्यांवरील अनधिकृत वाहनतळांविरोधात टोईंग वाहनांच्या माध्यमातून वाहने हटविणे, दंड आकारणे आणि आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी. औद्योगिक कंपन्या व वाहतूक संघटनांच्या वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ अथवा थांबा व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित कंपन्यांनी घ्यावी. उपलब्ध मोकळ्या जागांचा शोध घेऊन वाहनतळांची व्यवस्था करावी, तसेच त्यावर प्रत्यक्ष वेळेतील देखरेख व्यवस्था विकसित करावी, असेही डुडी यांनी स्पष्ट केले.
Chhatrapati Sugar Factory: वेळ पडली तर मी स्वतःला विकेन, पण ‘छत्रपती’ बंद पडू देणार नाही;
चाकण-शिक्रापूर मार्गावरील रस्ते सुधारणा कामे टप्प्याटप्प्याने होणार असल्याने काम सुरू करण्यापूर्वी वाहतूक नियोजन पूर्ण करावे. जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करावा, तर हलक्या वाहनांसाठी आवश्यकतेनुसार एकेरी वाहतुकीचे नियोजन करावे. रस्ते कामांच्या ठिकाणी भारतीय रस्ते मानकांनुसार सुरक्षाव्यवस्था करावी. कामाच्या ठिकाणापासून दोन ते तीन किलोमीटर आधी दिशादर्शक फलक आणि वाहतूक मार्गांचे नकाशे लावावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या.
अतिक्रमण हटविल्यानंतर विद्युत खांब व तारा हलविण्याची कामे एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने समन्वयाने तातडीने पूर्ण करावीत. प्रत्येक विभागाने आपल्या अखत्यारीतील कामांची जबाबदारी आणि कालमर्यादा निश्चित करून प्रगतीचा नियमित आढावा घ्यावा, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
बैठकीत चाकण परिसरातील नागरिकांनी वाहतूक, रस्ते, वाहनतळ आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विविध प्रश्न मांडले. या प्रश्नांवर प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली.






