पुणे : पुणेकरांनी भरभरून प्रेम दिले असून, त्यांचे प्रेम कायम स्मरणात राहिल. पुण्याचा वाढता विस्तार तसेच नागरिकीकरण यानुसार पुण्याला आणखी पोलीस ठाण्यांची गरज आहे. पुण्यात काम करताना नागरिकांच्या समस्यासोबतच गुन्हेगारीला लगाम लावण्यात यश मिळाले आहे. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न व सर्वच यंत्रणांनी एकत्र यावे लागेल, असे मत मत मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बुधवारी व्यक्त केले.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मंगळवारी रात्री बदली झाली. राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी गुप्ता यांची नियुक्ती केली. त्यानंतर गुप्ता यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गणेशोत्सव व पालखी सोहळ्याचा बंदोबस्ताचा अनुभव शब्दांत सांगता येत नाही, असे म्हणत गुप्ता म्हणाले, गणेशोत्सव आणि पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपे नाही. शहर साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात नावाजलेले आहे. पुणेरी पाट्या आाणि पुणेकरांची उपहासात्मक टीकेबद्दल ऐकले होते. मात्र, मला काम करताना उपहासात्मक टीकेला सामोरे जावे लागले नाही.
पुणेकरांनी कायम सहकार्य केले. शहरातील टोळ्या व दोन गटातील वादाला बऱ्याच प्रमाणात आटकाव करण्यात यश आले. त्यासोबतच परिसरात भाईगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली. आकडेवारीपेक्षाही गुन्हेगारीचा बिमोड करण्यावर आमचा भर होता. वाहतूक कोंडीवरुन पुणे पोलिसांवर टीका झाली. पण शहरातील अरुंद रस्ते, वाहनांची वाढती संख्या आणि अपुरे मनुष्यबळ या सर्वांचा विचारात घेऊन वाहतूक विषयक सुधारणा करण्यात आल्या. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
पुण्यात आणखी पोलीस ठाण्यांची गरज
शहराचा वाढता विस्तार तसेच वाढत जाणारी लोकसंख्या पाहता पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. ते दिवसेंदिवस कमी पडत जात आहे. पुण्यात आणखी पोलीस ठाण्यांची आवश्यकता आहे. पुण्यात आरोग्य विभाग भरती, म्हाडा प्रश्न पत्रिका फूट आणि लष्करी भरती प्रश्न पत्रिका फूट व बिटकॉईन चलन प्रकरणातील फसवणूक प्रकरणाचा सखोल तपास केला. तपास करताना राजकीय दबाब किंवा हस्तक्षेप झाला नाही. दोन वर्षात पुणे पोलिसांनी अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल केली.