
महाशिवरात्रीला हरिचंद्रगडावर दुर्घटना; दरड कोसळून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, महाशिवरात्रीचे औचित्य साधून सुरेश दामसे हे हरिश्चंद्रगडावर दर्शनासाठी आले होते. रविवारी सकाळी दर्शन आटोपून ते जुन्नर दरवाज्याकडील खडतर पायवाटेने खाली उतरत होते. यावेळी अचानक कड्यावरील एक मोठा सैल झालेला दगड निसटला आणि थेट सुरेश यांच्या डोक्यावर व पाठीवर आदळला. या भीषण आघातामुळे ते जागीच कोसळले आणि बेशुद्ध झाले. अपघात घडताच परिसरातील इतर भाविकांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र, हरिश्चंद्रगडाची ही पायवाट अत्यंत अरुंद आणि कठीण असल्याने जखमीला खाली नेणे मोठे आव्हान होते.
स्थानिकांनी जखमी सुरेश यांना खांद्यावरून झोळी करून सुमारे ५ किलोमीटर डोंगरदऱ्यातून पायपीट करत खिरेश्वर गावात आणले. खिरेश्वर येथून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, प्रचंड रक्तस्राव आणि गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्यांना तपासापूर्वीच मृत घोषित केले. सध्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने गडावर हजारो भाविकांची गर्दी होत आहे. अशा वेळी कड्यांवरील सैल दगड किंवा दरडींबाबत प्रशासनाने खबरदारी घेणे आवश्यक होते. या घटनेमुळे घोडेगाव परिसरात शोककळा पसरली असून, निसर्गप्रेमींकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर भाविकांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला असून, खालील मागण्या केल्या आहेत.
१) धोकादायक ठिकाणांची पाहणी करून सैल दगड हटवावेत.
२) गडावरील कठीण वाटांवर सुरक्षेचे कठडे किंवा जाळ्या बसवाव्यात.
३) आपत्कालीन मदतीसाठी गडावर कायमस्वरूपी रेस्क्यू टीम तैनात असावी.
”हरिश्चंद्रगडाची वाट आव्हानात्मक आहे, मात्र कड्यावरून दगड कोसळणे ही चिंतेची बाब आहे. प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, जेणेकरून पुन्हा अशी वेळ येणार नाही.” — एक स्थानिक भाविक